Translate

Friday, May 15, 2015

साधकाला अंतर्मुख व्हायला शिकवणारा सद्गुरू कसा असतो?


साधकाला अंतर्मुख व्हायला शिकवणारा सद्गुरू कसा असतो याचे पूज्य बाबा बेलसरे यांनी दिलेले अतिशय रम्य वर्णन -- साधकांना हे वाचल्यावर आपल्या सद्गुरुंबद्दल अधिकाधिक प्रेम उफाळून येईल याची खात्री वाटते. श्रीराम समर्थ!

श्रीराम. सद्गुरू कसा असतो याचे आपल्याला कुतूहल वाटणे साहजिक आहे. सद्गुरू हा अखेर आत्मदर्शन झालेला माणूसच असतो. बाहेरून बहुधा तो शांत, स्तब्ध व अनासक्त असतो. पण त्याचे अंतःकरण करुणेने भरून वाहते. त्याला दिव्यदृष्टी असल्यामुळे त्याच्या नजरेमध्ये काहीतरी विशेषपण आहे हे लक्षात येते. त्याच्याकडे येणाऱ्या माणसाचे अंतरंग त्याला दिसते. त्याच्याभोवती मनाला समाधान देणारे, अस्वस्थ मन शांत करणारे, मनाला निर्भय करणारे एक शीतल वातावरण असते. शरीराच्या दृष्टीने पाहिले तर तो इतर माणसांसारखा माणूस दिसतो. पण तो नुसता माणूस असत नाही. तो माणूस आणि ईश्वर यांचे एक मनोहर मिश्रण असतो. त्याला अज्ञात असे काही उरत नाही. पण त्याच्या ज्ञानाची आणि सामर्थ्याची कल्पना येण्यास श्रद्धेने त्याचा सहवास घडावा लागतो. सद्गुरूच्या केवळ नजरेने, स्पर्शाने, प्रसादाने, त्याने दिलेल्या नामाने किंवा त्याने केलेल्या विचार संक्रमणाने साधकाचे अंतरंग नकळत रूपांतरित होण्याच्या मार्गाला लागते.

सद्गुरूंनी शिष्याला दीक्षा देणे / अनुग्रह देणे म्हणजे फार मोठी जबाबदारी स्वीकारणे होय. शिष्याच्या गत आयुष्यातील पापपुण्याची जबाबदारी सद्गुरू घेतो यात नवल नाही. पण शिष्याला आत्मदर्शन होईपर्यंत त्याचे भविष्यकालीन जीवन सद्गुरू आपल्या सत्तेखाली घेतो. यामध्ये सद्गुरूचे खरे थोरपण सापडते. उरलेल्या या आयुष्यामध्ये आणि नंतर येणाऱ्या जन्मांमध्ये शिष्याला आत्म्याची विस्मृती होणार नाही हे सद्गुरूच्या कृपेचे लक्षण आहे. ती स्मृती जिवंत राहण्यास शक्ती लागते. तेवढी अध्यात्मिक शक्ती दीक्षा देताना सद्गुरू शिष्याच्या अंतरी स्थापन करतो.

सद्गुरूने साधकाच्या अभ्यासाला जे अध्यात्मिक वळण दिलेले असते त्याचे प्रधान लक्षण पुढीलप्रमाणे आहे- साधकाचे अंतिम ध्येय जे आत्मदर्शन ते आरंभापासून सूक्ष्मरूपाने त्याच्या अभ्यासात ओवण्याची व्यवस्था सद्गुरू करतो. आरंभी ते ध्येय सुप्त व गुप्त असते. त्याची खंडित जाणीव असते. पण प्रथम अभ्यासामध्ये ती जाणीव अखंड टिकू लागते. नंतर अभ्यासच जागेपणाला व्यापू लागतो. अर्थात आत्मस्मृती जागेपणी अखंड टिकते. मग पुढच्या दोन अवस्थांमध्ये - म्हणजे स्वप्न आणि गाढ झोप यांमध्ये - ती आपोआप झिरपते. यासच अखंड स्वस्वरूप अनुसंधान म्हणतात. अनुसंधानाची ही स्थिती गाठली की साधकाच्या अभ्यासाची सीमा गाठली असे निश्चित समजावे. त्या पातळीवर साधकाचा दृश्याशी संबंध सुटतो. तेथे साधक शरणागतीच्या दाराशी येतो!

No comments:

Post a Comment