श्रीराम. श्रीमहाराज, संत एकनाथ यांसारख्या संतांचे वैशिष्ट्य काय? तर प्रपंचात राहून परमार्थ साधायला यांनी शिकवलं. किती प्रचंड अन्नदान यांनी केलं! प्रपंची राहून आत्म्याचे अनुसंधान जपले जाऊ शकते याचे उदाहरण म्हणजे हे संत. महाराज तर म्हणायचे, काय चोरांनी लावलाय प्रपंच? तुम्ही अग्नी-ब्राह्मणांच्या समोर लग्न केलेत ना? त्यात वावगे काय आहे? महाराज म्हणजे आनंदमूर्ती. त्यांना हसून खेळून संसार करणारे नवरा बायको, आनंदाने राहणाऱ्या सासू सुना पाहिल्या की मनापासून आनंद होई. याला समग्र दृष्टीकोन म्हणतात. Holistic View! किंबहुना महाराज म्हणत, एखादा बैरागी आहे आणि त्याने साधना केली व एक प्रपंची आहे त्याने प्रपंचात राहून साधना केली; भगवंताला दुसरा जास्त आवडेल. कारण प्रपंच सोपा नाही. त्यात पावलापावलावर तुम्हाला शिकवण्यासाठी सुखदुःखाच्या घटना आहेत. म्हणून त्यात अनुसंधान टिकवणारा खरा श्रेष्ठ!
अनुसंधान कधी जमेल? जेव्हा तुम्ही भगवंताच्या अस्तित्वावर निष्ठा ठेवून लक्ष पुरवाल तेव्हा! त्यासाठी प्रपंचातल्या गोष्टीदेखील व्यवस्थित करणे जरूर आहे. प्रपंच कसातरी करून आम्ही अध्यात्माकडे लक्ष पुरवू म्हणणारे फसतील! महाराज म्हणत, प्रत्येक कर्म मनापासून करायला शिकावे. महाराज म्हणत असत की अगदी जेवायचे असले तरी मनापासून जेवावे, बोलायचे आहे ना तर अगदी मनापासून बोलावे, अभ्यास करायचा आहे ना, तर मनापासून करावा. कोणतीही गोष्ट असो, आपल्या मनाला अशी सवय लावून घ्यावी की ती अगदी मनापासून करावी, तरच भगवंताचे नामस्मरण मनापासून होईल.
अध्यात्मिक मनुष्य हा सदैव आनंदी असला पाहिजे. माझ्या अनुभवाने मी सांगेन, माझ्या साधनेत काव्य, संगीत, विनोद यांमुळे एक रसमय प्रसन्नता आली आणि ती वाढतच गेली. विनोद हा तर माझ्या साधनेचा घटकच होऊन बसला. अशा आनंदी वृत्तीत मनापासून नामाचा अभ्यास झाला तर साधकाची प्रगती व्यवस्थित होईल आणि वृत्ती समाधानी राहील!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे
No comments:
Post a Comment