Translate

Friday, May 15, 2015

लौकिकापासून साधकाला फार जपावे लागते!!


श्रीराम. लौकिकापासून साधकाला फार जपावे लागते. आपण खूप लवकर लौकिकाच्या जाळ्यात अडकतो. कुणी आपला मान केला की आपण त्याच्यावर प्रेम करू लागतो. कुणी मानसन्मानासाठी घरी अगत्याने बोलाविले तर आपण त्याच्यावर अधिक प्रेम करू लागतो. हे जाळे इतके गुंतागुंतीचे आहे की निदान साधकाने त्यापासून अतिशय जपून राहणे आवश्यक आहे. मुळात आपला "मी" मोठा असतो; तो अशा रीतीने अजून वाढवणे म्हणजे अध्यात्मिक संकटालाच बोलाविणे होय. समर्थ रामदास स्वामी आपल्या दासबोधातून तर मानासाठी कोणत्याही समारंभास जाणे देखील टाळावे असे आवर्जून सांगतात.

पूज्य बाबांना अनेक लोक ते अशा लौकिकात न अडकल्याने त्यांना गर्व आहे अशी चुकीची समजूत करून घेत. पण हा गर्व नसे तर आपल्या साधनासाठी सांभाळलेले पावित्र्य असे. पुढे पुढे पूज्य बाबा आपल्या मुलास सांगत समारंभास जो आहेर वगैरे द्यायचा त्याबाबत मला काहीही सांगू नका. मला त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही!

ज्ञानेश्वरीत तर ज्ञानोबा सांगतात, "मला मान मिळू नये म्हणून तो साधक वेड्यासारखा वागतो" म्हणजे लोकांना आपल्या विषयी चुकीची समजूत झाली तरी त्याला पर्वा नसते; पण तो मानाच्या जाळ्यात अडकत नाही. हे साधणे अवघड असले तरी एका खऱ्या साधकाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. खऱ्या साधकाला त्याच्या साधनापुढे दुसऱ्या कशाचेच महत्त्व नसते.

गुरुदेव रानडे यांनी आपल्या नामाच्या साधनेसाठी Viceroy बरोबर असलेल्या सभेस जाणे टाळले आणि वर म्हणाले, नामापेक्षा Viceroy मोठा आहे काय? इतके नाही जमले तरी निदान काही अंशी अमानित्व जतन करणे आपल्याला जमले पाहिजे. त्याशिवाय साधनात पुढे पाऊल पडणार नाही!

(पूज्य बापूसाहेब मराठे यांच्या प्रवचनातून)

1 comment:

  1. श्रीराम जय राम जय जय राम

    ReplyDelete