श्रीराम! सद्गुरू भेटण्याच्या आधी साधकाला दृश्याचे प्रेम असते. ते प्रेम असते म्हणून इंद्रियांना सुख देणाऱ्या वस्तू व व्यक्ति यांच्यासाठी त्याचे चित्त विरघळते. असे द्रवित झालेले चित्त त्या व्यक्तींशी कमीजास्त तदाकार होते. त्या तदाकारपणामध्ये क्षणभर रसाचा म्हणजे आनंदाचा अनुभव येतो. पण ती व्यक्ति अपूर्ण, अनित्य व अस्थिर असते. म्हणून तिच्याशी कायम तदाकारता होऊ शकत नाही. त्यामुळे रसाचा अभाव होतो. रसाचा अभाव झाला की जीव दुसरी व्यक्ति शोधतो. ही क्रिया जन्मभर चालते.
याच्या उलट आत्मदर्शनाने आत्मस्वरुप झालेला सद्गुरू स्वतः रसस्वरूप म्हणजे आनंदस्वरूप असतो. त्याच्याशी साधक-शिष्याचा प्रेमाचा संबंध आला तर साधकाचे चित्त विरघळते. चित्त विरघळले की ते त्याच्या-सद्गुरूच्या आनंदमय अंतःकरणाशी तदाकार होते. तेथे कोणत्याही प्रकारचा अभाव, अस्थिरपणा व उणेपणा अनुभवास येत नाही. याचा प्रत्यक्ष परिणाम असा होतो की सद्गुरूच्या प्रेमात सतत डुंबत राहण्यामध्ये साधकाला एक निराळेच समाधान मिळते.
*** हे समाधान दाखवता येत नाही. त्यामुळे गुरुशिष्यसंबंधामधे व्यवहार दृष्ट्या एक विरोधाभास दृष्टीस पडतो. तो हा की सद्गुरू शिष्याला काहीतरी देतात यात शंका नाही. पण काय देतात ते शिष्याला सांगता येत नाही smile emoticon पण रसाने डबडबलेले अपूर्व समाधान सद्गुरूकडून शिष्याला मिळते एवढे मात्र खरे! ***
जी परिस्थिती असेल तिच्यामधे पूर्ण समाधान राहणे ही सद्गुरूची देणगी असते ही खूण साधकाने मनाशी बाळगावी!!!
~ परमपूज्य बाबा बेलसरे (साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा)
No comments:
Post a Comment