Translate

Saturday, May 30, 2015

तुका म्हणे भाव | शुद्ध बरा सोंग वाव ||


श्रीराम. साधकाच्या दृष्टीने अतिशय मार्मिक आणि आचरणयोग्य असा तुकोबांचा अजून एक अभंग-
अवगुणांचे हाती | आहे अवघीच फजिती |
नाही पात्रासवे चाड | प्रमाण ते फिके गोड ||
विष तांब्या वाटी | भरली लाऊ नये होटी |
तुका म्हणे भाव | शुद्ध बरा सोंग वाव ||

~ श्रीराम. तुकोबांच्या अभंगांचे अर्थ लावताना श्रीमहाराज म्हणत की नेहमी दुसऱ्या ओवीपासून सुरुवात करावी, म्हणजे अर्थ जास्त नीट लागतो. त्याबरहुकूम- ज्या भांड्यात पदार्थ असतो, ते भांडे महत्त्वाचे नसून त्यातला रस फिका आहे की गोड हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वतःच्या अंगच्या अवगुणांची जाणीव होणे हे अतिशय महत्त्वाचे. तरच मुमुक्षत्वाकडून साधकत्वाकडे बिनधोक प्रवास होतो. अवगुण बाळगल्याने अवघी फजिती होते याचा अनुभव आपण घेतलेला असतो. तो अनुभव आत मुरून त्यावर इलाज करावा अशी मनापासून इच्छा उत्पन्न झाली पाहिजे. त्यातल्या त्यात सद्गुरूंच्या ताब्यात गेल्यावर अवगुणांची जाणीव होऊ लागली आणि त्यांना हे आवडत नाही हे जाणवू लागले की अजून ओशाळलेपणा येतो आणि हा भावच आपल्याला पुढे तारू शकतो. पूज्य तात्यासाहेबांसारखी व्यक्ती म्हणायची, हातून चूक झाली तर फोटोमध्ये महाराजांच्या डोळ्याला डोळा लागत नाही! काय भाव असेल!

तेव्हा चांगल्या वाईट धातूच्या भांड्याकडे लक्ष देण्याचे कारण नाही; त्यातील चांगला रस घ्यावा आणि वाईट टाकावा. पण हे दुर्गुण टाकण्याबरोबर सद्गुण अंगी बाणवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पूज्य बाबा बेलसरे तर म्हणत, आपल्या दुर्गुणांकडे देखील साधकाने फार लक्ष पुरवू नये. एकदा ते त्यागण्याचा अभ्यास सुरु झाला की आपल्यातले चांगले गुण वाढवण्याचा अभ्यास करावा; तरच साधनात शांतपणा येईल. इथे लौकिक दृष्ट्या असलेले दुर्गुण या अर्था बरोबरच साधनातील व्यग्रता जी अति वाचनाने, निरनिराळ्या माध्यमांमुळे वाढते तेही अभिप्रेत असावे. चांगले घ्यावे, पण चांगले कोणते ते कसे ठरवावे? जे ऐकले, जे वाचले, ते आपल्या सद्गुरूंच्या (ज्येष्ठ संतांच्या) सांगण्याशी किती जुळते, याचा विचार करून ते घ्यावे किंवा त्यागावे याचा विचार व्हावा असे पू. बाबा म्हणतात. यासाठी अर्थातच आपल्या सद्गुरूंचे विचार ही आपल्यासाठी काळ्या दगडावरची रेघ झाली पाहिजे! पू. बाबांचे एक वाक्य हृदयात कोरून ठेवण्यासारखे आहे- तुम्ही काय वाट्टेल ते वाचा; पण आपले सद्गुरू जे सांगतात त्याच्याशी ते विसंगत असेल, तर ते कितीही बरोबर वाटो, कधीच चिंतनाचा विषय ठरू नये!

तांबे पवित्र असते, पण तांब्याची वाटी विषाने भरलेली असेल, तर तांबे पवित्र म्हणून विष पिऊन चालेल का? तेव्हा काही चांगला विचार असेलही पण जर तो आपल्या निष्ठेशी विसंगत असेल तर ग्रहण केलाच पाहिजे असे नाही! शेवटचा चरण नेहमीप्रमाणे Crux आहे. आपले अवगुण ध्यानात येऊन त्यांची सुधारणा झाली तरच शेवटच्या ओळीत तुकोबांना अपेक्षित असलेला शुद्ध भाव साधेल. परमार्थात शुद्ध भाव, पवित्रता, भगवंताबद्दल उदात्त भावना यांनाच खरे महत्त्व आहे. ते नसेल तर नुसते शाब्दिक अवडंबर काय कामाचे? सोंग वाव!! महाराज देखील म्हणायचे- तुम्ही काही परमार्थ करू नका, नाम घेऊ नका, देवाला मानू नका पण ढोंग करू नका! तेव्हा अवगुणांचा त्याग, आत्मानात्मविवेकासहित साधना आणि शुद्ध भाव यांना गाठीशी धरूनच हा प्रवास करायचा आहे! श्रीराम समर्थ!!!

No comments:

Post a Comment