Translate

Saturday, May 30, 2015

आपुलाले तुम्ही करा रे स्वहित| वाचे स्मरा नित्य राम राम||



श्रीराम. कोणतीही साधना न करता "हे करून काय होणार आहे?" असा सवाल करणाऱ्या लोकांसाठी संतश्रेष्ठ तुकोबांचा हा अभंग. केल्याशिवाय त्याच्यातले सुख कळणार कसे? नाम घेतल्याशिवाय नामाने साधणारे समाधान मिळणार कसे? प्रत्यक्ष अनुभव घेणेच महत्त्वाचे!

अन्नाच्या परिमळे जरि जाय भूक| तरी का हे पाक घरोघरी||
आपुलाले तुम्ही करा रे स्वहित| वाचे स्मरा नित्य राम राम||
देखोनि जीवन जरी जाय ताहान| तरी का साठवण घरोघरी||
देखोनिया छाया सुख न पाविजे| जंव न बैसीजे तया तळी||
हित तरी होय गाता आइकता| जरि राहे चित्ता दृढ भाव||
तुका म्हणे होसी भावेचि तू मुक्त| काय करिसी युक्त जाणिवेची||

अहो, शिजलेल्या अन्नाच्या वासाने जर भूक भागली असती, तर लोक घरोघरी स्वैपाक करून भोजन कशासाठी करत असते? प्रत्यक्ष अनुभवला महत्त्व आहे, म्हणून अहो परमार्थी जन, वाणीने नित्य रामराम म्हणून, रामाचे स्मरण करून आपले हित साधून घ्या. जर पाणी पाहूनच तहान भागात असतो तर लोकांनी घरोघरी नुसते पाणी साठवले नसते का? वृक्षाची नुसती सावली पाहून सुख मिळत नाही; त्या सावलीखाली बसल्यानेच त्यातले सुख अनुभवास येते. तेव्हा श्रीहरीचे गुण गाणे ऐकणे याविषयी चित्तात दृढ भाव राहिला तर हित साधेल. ज्ञानाच्या अहंकाराला धरून काय मिळवशील? अरे, तू केवळ एकनिष्ठ भावानेच मुक्त होशील!

No comments:

Post a Comment