श्रीराम. आत्मस्वरूपाचे अविरत स्मरण ठेवण्याची सवय अंगी जिरवताना अनात्म वस्तूंचे विस्मरण करण्याचा प्रयत्न करावा लागतो. अंतर्मुख होण्याची ही पहिली पायरी समजावी.
परंतु आत्मस्वरूपाचे स्मरण ठेवण्याचा मनाचा स्वभाव झाल्यानंतर सर्व अनात्म दृश्य वस्तूंपासून साधकाचे मन विनासायास परावृत्त होते. अंतर्मुख होण्याची ही दुसरी पायरी होय. या पायरीवर रूपांतरित झालेले मन ज्या देहामध्ये राहाते तो देहदेखील बदलतो.
त्याचे असे होते, की नामस्मरणाच्या अविरत पुनरावृत्तीने प्रथम मेंदूमधील पेशींवर स्मरणाचा म्हणजे नामाचा छाप उमटतो. त्याच अखंड स्मरणाने रक्तातील पेशींमध्ये सुप्त असणारी जाणीव जागी होते. ती जाणीव जागी झाली की मूलाधार, स्वाधिष्ठान आणि बेंबीपाशी असणारे सूर्यचक्र यांची हालचाल आरंभ पावते. ती हालचाल करणाऱ्या शक्तिला योगशास्त्रामध्ये कुंडलिनी असे नाव आहे.
*** शरीरातील तम आणि रज यांना शुद्ध करून सत्वाची वाढ करणे हे नामस्मरणाने जागी झालेल्या कुंडलिनीचे खरे कार्य आहे ***
रज आणि तम शुद्ध होऊन सत्व वाढला की तो पारदर्शक बनतो. त्याच्यामध्ये आत्मस्वरूपाचे पडणारे प्रतिबिंब स्वच्छपणे दिसते. यासच अध्यात्मामध्ये चित्तशुद्धि म्हणतात! असा चित्तशुद्धि झालेला साधक गुरुकृपेला पात्र होतो व त्याचे नाम अखंड चालू लागते!!!
~ परमपूज्य बाबा बेलसरे
No comments:
Post a Comment