श्रीराम. परवा एका साधकांनी श्रीमहाराजांचे एक अप्रतिम वचन पोस्ट केले होते. ते असे- “परमार्थ मार्गामध्यें अर्ध्यापर्यंत गेल्यावर मग पुढें जाणारे साधक फार थोडे असतात. मोठें मोठें साधनी लोक लौकिकाच्या नादीं लागून भगवंताच्या जवळ येऊन घसरतात!” हे होऊ नये व यापासून मला दूर ठेवावे यासाठी रचलेला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अप्रतिम आणि अर्थपूर्ण अभंग-
नाही सुख मज न लगे हा मान | न राहे हे जन काय करू ||
देह उपचारे पोळतसे अंग | विषतुल्य चांग मिष्टान्न ते ||
नाइकवे स्तुती वाणीता थोरीव | होतो माझा जीव कासावीस ||
तुज पावे ऐसी सांग काही कळा | नको मृगजळा गोवू मज ||
तुका म्हणे आता करी माझे हित | काढावे जळत आगीतुनी ||
देह उपचारे पोळतसे अंग | विषतुल्य चांग मिष्टान्न ते ||
नाइकवे स्तुती वाणीता थोरीव | होतो माझा जीव कासावीस ||
तुज पावे ऐसी सांग काही कळा | नको मृगजळा गोवू मज ||
तुका म्हणे आता करी माझे हित | काढावे जळत आगीतुनी ||
~ हे देवा, मला मान नको. त्यापासून मला थोडेही सुख नाही. पण हे लोक माझा मान केल्यावाचून राहात नाहीत. त्याला मी काय करू? लोक माझ्या देहाला सुख होईल असे उपचार करतात. पण त्याने माझे शरीर पोळत आहे. गोड अन्नसुद्धा मला विषाप्रमाणे कडू वाटते. कोणी माझी स्तुती केली, माझा मोठेपणा वर्णन केला तर मला ऐकवत नाही. माझा जीव कासावीस होतो. देवा, तुझ्या ठायी मी एकरूप होईन असा काही उपाय तू मला सांग. अशी युक्ती सांग. या मृगजळात आता मला गुंतवू नकोस. देवा, आता माझ्या हिताचा विचार करा आणि मला या त्रिविध तापरूपी अग्नीतून बाहेर काढा.
~ लौकिकदृष्ट्या खरा साधक कसा असतो किंवा कसा असावा यासाठी यापेक्षा चांगला अभंग नाही असे वाटते. श्रीमहाराज म्हणत, मानाची इच्छा ही रक्तातली साखर आहे. ती दिसत नाही पण साधकाला खाली खेचते. लौकिकाला जो भुलला त्याचा परमार्थ बुडाला हे तत्त्व अतिशय सावधपणे अंगी बाणवावे. पूज्य बाबा बेलसरे यांची अफाट बुद्धिमत्ता लक्षात घेऊनच महाराजांनी त्यांना अखेरपर्यंत अमानित्वाचा अभ्यास सांगितला आणि या महात्म्याने हे व्रत आयुष्याच्या अखेरपर्यंत प्राणापलीकडे सांभाळले. जगभरात प्रसिद्धी मिळण्याची ज्याची योग्यता त्या माणसाने केवळ सद्गुरू-आज्ञा प्रमाण मानून लौकिक दृष्ट्या जिथे मान मिळाले अशा जागी जाणे देखील टाळले. ज्ञानेश्वरीत तर ज्ञानोबा सांगतात, "मला मान मिळू नये म्हणून तो साधक वेड्यासारखा वागतो".
पूज्य बाबा काय म्हणतात, “तुम्ही विचाराल हे लौकिक दृष्ट्या खरेच शक्य आहे का? तर लौकिकात तुम्हाला आपले गुण दाखवावे लागतील हे मान्य. उद्या जर तुमचा interview आहे आणि तुम्ही म्हणालात की मी माझे गुण कसे दाखवू तर तो वेडेपणा होईल. पण हे आपण अध्यात्मिक दृष्ट्या बघत आहोत ना. लोक मला विचारतात, आमचा साडेतीन कोटी जप होऊन सुद्धा का साधत नाही? तर त्यासाठी बाधक गोष्टी कमी झाल्या पाहिजेत; तर ते साधणार! आणि मानाची इच्छा ही परमार्थातील एक अतिशय बाधक गोष्ट आहे.” नाम कसेही घेतले तरी त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहात नाही हे जरी खरे असले, तरी साधक गोष्टींचा अभ्यास आणि बाधक गोष्टी सोडणे याशिवाय मनाला जी सूक्ष्मता यायला हवी ती साधणार नाही! आणि नाम सूक्ष्मातले असल्याने अखंड समाधान जे साधायचे ते त्याशिवाय साधणार नाही!
यापुढे जाऊन पू बाबा म्हणतात, ‘यासाठी सद्गुरूंची मनापासून प्रार्थना करावी, जशी या अभंगात तुकोबा करताहेत. महाराजांची खरी कृपा असेल तर या गोष्टींपासून आपल्याला परावृत्त करण्यामध्ये आहे. खऱ्या साधकाला सद्गुरू सांभाळतातच!’ श्रीराम समर्थ!!!