Translate

Saturday, October 3, 2015

या संसारी सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले!


(परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या एका प्रवचनाचा सारांश)-

श्रीराम. कॉलेज ला होतो तेव्हा दासबोध वाचताना समर्थांची "या संसारी सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले" ही ओवी वाचली. तेव्हा फारसं कळत नव्हतं. वाटलं, समर्थ अतिशयोक्ती करताहेत. जर संसारात सुख नसतं तर इतके लोक संसारात पडले असते कशाला? पण आता जेव्हा गोंदवल्यास येतो आणि लोकांना भेटतो, तेव्हा कळतं, अरेरे! किती दुःख आहे जगामध्ये! केवळ प्रपंचामध्ये राहून 'पूर्ण सुखी' असा माणूस तुम्ही पाहिलाय का? शक्यच नाही!

अहो या विश्वात कितीतरी ध्येयं आहेत. दृश्यामध्ये ध्येयांची कमी नाही. अगदी स्वातंत्र्य मिळावं हे सुद्धा ध्येयच होतं ना? ध्येय मनुष्य कशासाठी ठरवतो; की त्या ध्येयाप्रत एकदा पोचल्यानंतर सुख समाधान मिळावं म्हणूनच ना? पण ते शक्य होतं का? आपण बघतोच आहोत. पण मग साधुसंत तर छातीला हात लावून सांगतात की आमच्याकडे साधन आहे सुख समाधान मिळवण्याचं? हे कसं?

तर जोवर आपण सुख समाधान दृश्यामध्ये शोधतो, तोवर ते मिळणं अशक्य आहे. जर मिळालं असं वाटत असेल, तर ते क्षणिक आहे. तेव्हा साधुसज्जनांनी सांगितलं, तुझं जे काही कर्म आहे, तेच तू कर. पण माझ्यासाठी किंवा माझ्या लोकांसाठी केलं म्हणू नकोस; ईश्वरासाठी केलं म्हण. जोवर कर्मात ईश्वर घातला नाही, तोवर कर्म पूर्ण होणारच नाही आणि जिथे पूर्णता नाही, तिथे समाधान असणं शक्य नाही!

तेव्हा समर्थांच्या ओवीचा अर्थ असा की जोवर मनुष्य ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाला लागला नाही, तोवर समाधान नाही नाही नाही!

1 comment: