ज्ञानेश्वरी अध्याय २- ओवी क्रमांक ५९-
तू गुरु बंधू पिता | तू आमुची इष्ट देवता |
तूचि सदा रक्षिता | आपदी आमुतें || ५९ ||
तूचि सदा रक्षिता | आपदी आमुतें || ५९ ||
~ श्रीराम. (अर्जुन आपला सखा कृष्ण याला माझे हित काय आहे ते आता तूच सांग अशी विनवणी करतो, तेव्हा त्या सख्यत्वाच्या आधारावरची पुढील ओवी आणि त्यावरील पूज्य बाबांच्या विवरणाचा सारांश).
या ओवीतलं एकेक पद बघा. पहिल्यांदा अर्जुन कृष्णाला गुरु म्हणतो. गुरु म्हणजे तो ज्ञानी आहे, श्रेष्ठ आहे. म्हणजे जे शिकावयाचे ते तुझ्यापासूनच शिकावयाचे! हा देवाशी अथवा सत्पुरुषाशी संबंध आहे. नंतर बंधू- बंधू याचा अर्थ असा आहे की, मी खाली जात असताना मला वर नेणारा. दुसरा अर्थ श्रीमहाराजांनी सांगितला की, गुरुबंधू म्हणजे गुरूला काय आवडते ते सांगणारा! नेहमी असे असते की, जे ज्येष्ठ श्रेष्ठ असतात ते आपल्या गुरुचं अंतःकरण लवकर ओळखतात. आणि त्यांना काय आवडते ते सांगू शकतात. ते आपल्याला गुरूंशी कसं वागावं हे शिकवतात. जे ज्ञान देतात ते गुरुबंधू. पिता चा अर्थ आहे- रक्षणकर्ता!
यामध्ये ‘तू आमुची इष्ट देवता’ हे फार महत्त्वाचे आहे. एकच देव! आपल्याला ते चमत्कारिक वाटते, पण भक्तीमध्ये प्रेमाची अतिशय एकाग्रता होण्याला हे आवश्यक आहे. तुलसीदासांची एक गोष्ट आहे. हे रामभक्त. त्यांना कुणी सांगितले की श्रीकृष्ण हा पूर्णावतार आणि त्याला १६ कला होत्या. राम हा मर्यादापुरुषोत्तम आणि त्याला ९ कला होत्या. तर त्या गृहस्थाचे म्हणणे असे की १६ कला असलेल्या श्रीकृष्णाची तुलसीदासांनी भक्ती करावी. तुलसीदास त्यावर म्हणाले, “मला रामामध्ये ९ कला आहेत हे माहीत देखील नव्हते. तेव्हा आता तू सांगितलेस तर माझी रामभक्ती ९ पट वाढेल! भक्ताच्या जीवनात अशी एक अवस्था येते, की त्याला दुसरा देव नाही!
~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड २ रा)
No comments:
Post a Comment