Translate

Sunday, October 4, 2015

ज्ञानेश्वरी अध्याय २- ओवी क्रमांक ५९-

ज्ञानेश्वरी अध्याय २- ओवी क्रमांक ५९-

तू गुरु बंधू पिता | तू आमुची इष्ट देवता |
तूचि सदा रक्षिता | आपदी आमुतें || ५९ ||

~ श्रीराम. (अर्जुन आपला सखा कृष्ण याला माझे हित काय आहे ते आता तूच सांग अशी विनवणी करतो, तेव्हा त्या सख्यत्वाच्या आधारावरची पुढील ओवी आणि त्यावरील पूज्य बाबांच्या विवरणाचा सारांश).

या ओवीतलं एकेक पद बघा. पहिल्यांदा अर्जुन कृष्णाला गुरु म्हणतो. गुरु म्हणजे तो ज्ञानी आहे, श्रेष्ठ आहे. म्हणजे जे शिकावयाचे ते तुझ्यापासूनच शिकावयाचे! हा देवाशी अथवा सत्पुरुषाशी संबंध आहे. नंतर बंधू- बंधू याचा अर्थ असा आहे की, मी खाली जात असताना मला वर नेणारा. दुसरा अर्थ श्रीमहाराजांनी सांगितला की, गुरुबंधू म्हणजे गुरूला काय आवडते ते सांगणारा! नेहमी असे असते की, जे ज्येष्ठ श्रेष्ठ असतात ते आपल्या गुरुचं अंतःकरण लवकर ओळखतात. आणि त्यांना काय आवडते ते सांगू शकतात. ते आपल्याला गुरूंशी कसं वागावं हे शिकवतात. जे ज्ञान देतात ते गुरुबंधू. पिता चा अर्थ आहे- रक्षणकर्ता!

यामध्ये ‘तू आमुची इष्ट देवता’ हे फार महत्त्वाचे आहे. एकच देव! आपल्याला ते चमत्कारिक वाटते, पण भक्तीमध्ये प्रेमाची अतिशय एकाग्रता होण्याला हे आवश्यक आहे. तुलसीदासांची एक गोष्ट आहे. हे रामभक्त. त्यांना कुणी सांगितले की श्रीकृष्ण हा पूर्णावतार आणि त्याला १६ कला होत्या. राम हा मर्यादापुरुषोत्तम आणि त्याला ९ कला होत्या. तर त्या गृहस्थाचे म्हणणे असे की १६ कला असलेल्या श्रीकृष्णाची तुलसीदासांनी भक्ती करावी. तुलसीदास त्यावर म्हणाले, “मला रामामध्ये ९ कला आहेत हे माहीत देखील नव्हते. तेव्हा आता तू सांगितलेस तर माझी रामभक्ती ९ पट वाढेल! भक्ताच्या जीवनात अशी एक अवस्था येते, की त्याला दुसरा देव नाही!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड २ रा)

Saturday, October 3, 2015

हेचि देवाचे दर्शन| चित्ती राहे समाधान ||

||श्रीराम समर्थ||


ज्ञानेश्वरी विचारधारा ४-

नाम घेत आहोत म्हणजेच योग्य मार्गावर आहोत!

श्रीराम.
~~ एक माणूस गिरणीच्या यंत्रशाळेत गेला. तिथे त्याचे उपरणे एका चाकात अडकले, तर हा हा म्हणता तो सर्वच त्यात ओढला गेला. तसे माणूस भगवंताचे नाम घेऊ लागल्यावर तो पोहोचतोच यात शंका नाही. त्याची जी खेच आहे, त्याला अभिक्रम म्हणतात.

~~ भगवंताचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही.

~~ आपली आतली घाण जेवढी असते ती नाहीशी करण्यास लागणारा प्रयत्न आपला होत नाही, म्हणून आपली प्रगती दिसत नाही.

~~ महाराज एकदा म्हणाले, "गाईने शेण टाकले की ते थोडीतरी माती घेतल्याशिवाय उठणार नाही. तसे तुम्ही थोडी जरी भक्ती केलीत तर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तो परिणाम सूक्ष्मातला असल्याने कळणार नाही.

~~ प्रगती होत आहे की नाही हे लोकांनी सांगण्यापेक्षा आपल्याला आपल्या मनानेच सांगितले पाहिजे की मी योग्य मार्गावर आहे.

~~ कबीराचे वाक्य नेहमी लक्षात ठेवावे- "कहत कबीरा सुन मेरे गुणिया | साहेब मिले सबुरी में ||" याला अरविंदांचे वाक्य फार सुंदर आहे, "You must have intense aspiration but with great patience." या पेशन्स चा अर्थ असा की मला मनाची शांतता पाहिजे यात शंका नाही पण ती तुझ्या इच्छेप्रमाणे, तुला हवे तेव्हा मला दे. नाम घेतले की थोडक्या काळात साधू होईल असे कठीण आहे!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड २ रा)

ज्ञानेश्वरी विचारधारा ३-

नामस्मरणाच्या अभ्यासाला तळमळ आवश्यक;
तत्त्वज्ञानाचा उपयोग साधनेसाठी!

परमपूज्य बाबा बेलसरेंच्या ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या खंडाच्या प्रस्तावनेतील काही भागाचा सारांश -

ती. बाबा एकदा अगदी सहज बोलताना म्हणाले, "अरे, सामान्य माणूस आपली डिग्री मिळवण्यासाठीसुद्धा पद्धतशीर प्रयत्न करीत नाही; अभ्यासाची पद्धत किती जणांना माहीत असते? नामस्मरण हा एक जन्मभर चालणारा अभ्यास आहे याची जाणीव किती लोकांना असते? मग अर्धवटपणे केलेल्या नामस्मरणाने काय साध्य होईल?" अशा त्यांच्या काही सूचना वाचकांना कदाचित आवडणार नाहीत, कारण सत्य हे कटू असते आणि ते श्रोत्यांना ऐकायला आवडत नाही. पण, जे अप्रिय आहे, परंतु पथ्यकारक आहे, ते सांगणारा व ऐकणारा भेटणे दुर्लभ असते!

ज्ञानेश्वरीच्या दुसरा अध्याय आणि त्यावरचे ती. बाबांचे विवेचन याचा अभ्यास झाल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ती. बाबांना या सर्व विवेचनातून वाचकांना असे सांगावयाचे आहे की, या तत्त्वज्ञानाचा उपयोग केवळ आपल्या बुद्धीचे समाधान होण्यासाठी नसून त्याचा उपयोग आपले साधन अधिक दृढ व्हावे यासाठी केला पाहिजे. आपले साधन अधिक सातत्याने, चिकाटीने व नीट समजून केले तर ते अधिक फलदायी होईल. ती बाबा म्हणत, साधन हा एक अभ्यास आहे आणि तो जन्मभर चालणारा आहे.

माणूस पदवी मिळवण्यासाठी, नंतर व्यवसायात यश, पैसा ऐश्वर्य मिळावे म्हणून, समाजात मानमान्यता मिळावी म्हणून अभ्यास करतोच. याला Management of Objective असे म्हणतात. परमार्थाची साधना ही अशी नाही. ती कर्मयोगासारखी जास्त आहे.

***"हा अभ्यास सतत त्याच तीव्रतेने चालणे हेच त्याचे फळ आहे"***

महाराज म्हणत असत की, नामाने काय साधावे तर नामच साधावे!

ज्ञानेश्वरी विचारधारा २-

श्रीराम. आज तीन गोष्टी सांगतो तुम्हाला. या अगदी अनुभवाच्या आहेत. या गोष्टी झाल्या तर आपले भाग्य उदयाला आले असे समजावे!

१) हे अध्यात्म शास्त्र असे आहे, की ते एखाद्या व्यक्तीच्या तर्फेच रात्रंदिवस कानी पडावे; तरच हे साधते.

२) दुसरी गोष्ट अशी की स्वाभाविकच अनासक्त वृत्ती असावी. पैशाचे प्रेम फार नसावे, देहाचे प्रेम फार नसावे ही पुण्यायीचीच गोष्ट आहे.

३) आणि तिसरी गोष्ट ही की भगवंताचे स्मरण मला असावे ही स्वाभाविक तळमळ असावी.
या तीन पुण्यायीच्या गोष्टी आहेत. त्या जर अंगी आल्या तर पुण्य उदयाला आले असे समजावे!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड १ ला)

माझ्याकडून सद्गुरूंचा पराभव होऊ नये!


तुझिया मार्गे चालाया मनबुद्धि व्हावी स्थिर |

मागणे आता इतुकेचि देई आई दान || 


या संसारी सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले!


(परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या एका प्रवचनाचा सारांश)-

श्रीराम. कॉलेज ला होतो तेव्हा दासबोध वाचताना समर्थांची "या संसारी सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले" ही ओवी वाचली. तेव्हा फारसं कळत नव्हतं. वाटलं, समर्थ अतिशयोक्ती करताहेत. जर संसारात सुख नसतं तर इतके लोक संसारात पडले असते कशाला? पण आता जेव्हा गोंदवल्यास येतो आणि लोकांना भेटतो, तेव्हा कळतं, अरेरे! किती दुःख आहे जगामध्ये! केवळ प्रपंचामध्ये राहून 'पूर्ण सुखी' असा माणूस तुम्ही पाहिलाय का? शक्यच नाही!

अहो या विश्वात कितीतरी ध्येयं आहेत. दृश्यामध्ये ध्येयांची कमी नाही. अगदी स्वातंत्र्य मिळावं हे सुद्धा ध्येयच होतं ना? ध्येय मनुष्य कशासाठी ठरवतो; की त्या ध्येयाप्रत एकदा पोचल्यानंतर सुख समाधान मिळावं म्हणूनच ना? पण ते शक्य होतं का? आपण बघतोच आहोत. पण मग साधुसंत तर छातीला हात लावून सांगतात की आमच्याकडे साधन आहे सुख समाधान मिळवण्याचं? हे कसं?

तर जोवर आपण सुख समाधान दृश्यामध्ये शोधतो, तोवर ते मिळणं अशक्य आहे. जर मिळालं असं वाटत असेल, तर ते क्षणिक आहे. तेव्हा साधुसज्जनांनी सांगितलं, तुझं जे काही कर्म आहे, तेच तू कर. पण माझ्यासाठी किंवा माझ्या लोकांसाठी केलं म्हणू नकोस; ईश्वरासाठी केलं म्हण. जोवर कर्मात ईश्वर घातला नाही, तोवर कर्म पूर्ण होणारच नाही आणि जिथे पूर्णता नाही, तिथे समाधान असणं शक्य नाही!

तेव्हा समर्थांच्या ओवीचा अर्थ असा की जोवर मनुष्य ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाला लागला नाही, तोवर समाधान नाही नाही नाही!

ज्ञानेश्वरी विचारधारा १


श्रीराम. कोणताही ग्रंथ अतिशय पवित्रपणे वाचावा असे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत सांगतात. पवित्रपणे म्हणजे बाहेरून देहानेच नव्हे, तर मनसुद्धा प्रपंचात नसावे. आणि हा नियम भगवंताच्या नामाला लागू करावा. आता मी नामाला बसतो म्हणजे प्रपंचाचा मी नाही, मनाने मी नाही, देहाने प्रपंचात राहावे लागेल, पण मनाने मी प्रपंचाचा नाही. असे म्हणून जर आपण नामाला बसलो, तर त्याची लज्जत काही निराळीच येईल.

याला दोन उपाय आहेत. एक आपण नेहमी आपल्या गुरूंचे चिंतन करावे, त्यांचे स्मरण करावे. त्यांचे स्मरण करावे म्हणजे काय तर त्यांचे व्यक्तिमत्व कसे होते ते स्मरण करावे. हे जर फार सूक्ष्म वाटले तर त्यांच्या चरित्रातला आपल्याला आवडणारा भाग घ्यावा आणि त्याचे चिंतन करीत आपण भगवंताच्या नामाला बसावे. यांपैकी एक कोणतेही धरून नामाला बसावे. जे आपल्याला आवडते ते धरावे.

मी कशाकरता जगतो आहे तर भगवंताकरता ही भावना ठेवून आपण नाम घेतले, तर मनाची अवस्था तीच होईल!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड १ ला)

खरा अनुग्रह म्हणजे काय?

||श्रीराम समर्थ||


ज्ञानेश्वरी अध्याय १ ला- ओवी क्र. ५६-

श्रीराम. या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचा किंवा कोणत्याही अध्यात्मग्रंथाचा अभ्यास कसा करावा हे सांगितले आहे; त्यामुळे सर्वांनाच ही ओवी अतिशय उपयुक्त आहे आणि परमपूज्य बाबांच्या विवेचनाने त्यास वसंत-बहर आला आहे हे निश्चित!

जैसे शारदीचिये चंद्रकळे | माजि अमृतकण कोंवळे |
ते वेचिती मने मवाळे | चकोरतलगे ||५६||

~ शरद ऋतू म्हणजे थंडीचा काळ. त्यामध्ये पौर्णिमा आली की आकाश स्वच्छ असते. त्यात मनाला शांत करणारे चांदणे असते. कल्पना अशी आहे, की त्या प्रकाशामध्ये अमृताचे कण असतात आणि हे कोवळे अमृतकण चकोराचे जे पिल्लू असते, ते सेवन करते. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भाषाप्रभूच! त्यांनी म्हटले आहे, 'चकोरतलगे', तलग म्हणजे लहान पिल्लू. चकोर पक्षी आहे, तो आकाशात विहार करतो. त्या पिल्लाला मात्र उडता येत नाही, म्हणून ते जमिनीवर चालणार. तलग म्हणजे तलावर चालणारे. अतिशय नाजूक असते ते. आईने भक्ष्य आणल्यावर ते चोच उघडते, त्यात दात नसतात तर भक्ष्य ते फक्त गिळते. तसे या ग्रंथाचे सेवन करावे.

*** याचा खरा अर्थ असा की, मला भगवंताचे प्रेम नाही, मला भक्तीच्या आकाशात संचार करता येत नाही, असा मी अज्ञ आहे. त्या अज्ञानाची जाणीव ठेवून हा ग्रंथ वाचा.***

या ग्रंथामध्ये शरदाचे चांदणे आहे आणि त्यात कोवळे अमृतकण आहेत. ते जे नाजूक नाजूक सांगितलेले आहे, ते भगवंताचे प्रेम आहे! ते मला कळत नाही असे म्हणून लहान होऊन त्याचे सेवन करा. माणसामध्ये ही शक्ती आहे की तो वयाने मोठा असला तरी, लहान मूल बनू शकतो.

***सगळे संत भगवंतापुढे मूल झाले म्हणून पोहोचले हे लक्षात ठेवा!***

उपनिषदांनी तर सांगितलेच आहे, "पाण्डित्यं निर्वेद्य, बाल्येन तिष्ठासेत्", वेद्य म्हणजे जाणणे. मला कळत नाही असे खरे वाटून जर मनुष्य बाल वृत्तीचा झाला, तर तो संतांना प्रियच होईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे की, त्या चकोराच्या पिल्लासारखे जे असतील, त्यांना ज्ञानकण मिळतील!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड १ ला)

श्रीरंग म्हणजे आत बाहेर प्रेमाने भरलेला असा तो श्रीकृष्ण!

||श्रीराम समर्थ||


ज्ञानेश्वरी अध्याय १ ला - ओवी क्र. ४९-

श्रीराम. ज्ञानेश्वरी अध्याय १ ला - ओवी क्र. ४९- (परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या ग्रंथातील सारांश) - पावित्र्याची खूण ~~

जे अद्वितीय उत्तम | पवित्रैक निरुपम |
परम मंगलधाम | अवधारिजो ||४९||

~ महाभारत हा ग्रंथ कसा आहे ते ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. अत्यंत पवित्र आणि अद्वितीय असा हा ग्रंथ आहे. मंगलाचे धाम आहे. याचा विस्तार केवढा प्रचंड आहे! ज्ञानेश्वर महाराजांनी नऊ हजाराच्या वर ओव्या लिहिल्या आहेत. पण पहिल्या 'ओम नमोजी' मध्ये स्फूर्तीची जी तीव्रता आहे, प्रकाश आहे, तो शेवटपर्यंत तसाच आहे. काय त्यांची प्रतिभा असेल! म्हणून "अद्वितीय, उत्तम आणि पवित्रैक निरुपम!"

पावित्र्याची खूण काय आहे, तर आपले मन मानवी दोषांतून क्षणभर तरी मुक्त होणे, हे पावित्र्याचे लक्षण आहे. जी व्यक्ती पाहिल्यावर आपल्या मनातील वासना कमी होते, मन स्वच्छ होते, ती व्यक्ती दिव्य आहे असे समजावे. त्यांच्याभोवती ते वातावरणच असते. ही प्रसन्नता साधी वृत्तीची प्रसन्नता नव्हे, तर आपले मन देहबुद्धीतून बाहेर पडते त्याची प्रसन्नता असते. अशी काही स्थाने असतात, की तेथे गेल्यावर तुम्ही स्वतःला विसरता. ही स्थाने सत्पुरुषांची असतात. तो सत्पुरुष शक्तीचा झरा असतो. सत्पुरुषांच्या पाया का पडावे, तर त्यांच्या अंगी परमात्मशक्ती प्रकट झालेली असते. त्याचा स्पर्श सुद्धा आपल्याला पवित्र बनवतो!

अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी~ श्रीमहाराज

||श्रीराम समर्थ||


ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक. २२-

ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक. २२- (अध्याय १ ला)

श्रीराम.

"मज हृदयी सद्गुरू | जेणे तारिलो हा संसारपूरु |
म्हणौनि विशेष अत्यादरु | विवेकावरी ||"

~~ या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी एक मर्माची गोष्ट सांगितली आहे. गुरूचे अस्तित्व कशात आहे? आपण लक्षात ठेवा की गुरूने जी आज्ञा केली आहे, त्या वचनामध्ये तो आहे! आपण शब्दांवर किती विश्वास ठेवतो! जग हे शब्दांवर चालते आहे. म्हणून गुरूच्या शब्दाचे सामर्थ्य फार आहे. माझ्या हृदयामध्ये सद्गुरू अधिष्ठान आहे, यात फार जबरदस्त अर्थ आहे. माझ्या हृदयामध्ये मी नाही तर सद्गुरू आहे माझा. तो कशा रूपाने आहे? तर विवेकाच्या रूपाने आहे.

या गुरूचे कार्य काय? तर हा संसारपूरु तारिला. जगामध्ये सत्य जे आहे ते माझे गुरु. आपल्याला खरे काय आहे ते अर्थरूपाने कळवून दिले असा तो गुरु आहे. या सबंध विश्वाला जो अर्थ आहे, त्याला अरविंदांनी Divine Will असे म्हटले आहे. तो अर्थ समजणे हे विवेकाचे काम आहे. या जगात व्यवस्था आहे. या जगतामध्ये आपण आलो हे काही कार्य करण्यासाठी आलो आहोत. ते कार्य मला ईश्वराने नेमून दिलेले आहे. ते कार्य झाले की मी चाललो. तोपर्यंत माझ्या जीवाला धोका नाही. ही गोष्ट शिकण्यासाठी हा सारा खटाटोप आहे. ती Divine Will किंवा ईश्वराचा संकेत कळणे हे खरे परमार्थाचे मर्म आहे.

अशा रीतीने सबंध ज्ञानेश्वरीमध्ये आत्मानात्मविवेकच सांगितला आहे. हे ज्याने "केले", त्याला ज्ञानेश्वरी कळली!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड १ ला)

विचार उसना घेता येतो; भावना उसनी घेता येत नाही!

||श्रीराम समर्थ||


गुरुसेवा म्हणजे काय?


श्रीराम. सर्व संत सांगतात, गुरुसेवा महत्त्वाची! पण गुरुसेवा म्हणजे काय?

महाराज म्हणाले, याचे उत्तर खूप सोपे आहे. गुरूला आवडेल ते केले म्हणजे गुरुसेवा झाली. आता प्रश्न आला, गुरूला काय आवडतं? एका भगवंताशिवाय गुरूला काहीच आवडत नाही. ते आपल्याला आवडलं की गुरुसेवा झाली!

महाराज पुढे म्हणाले, "आयुष्यातला थोडा काळ तरी असा घालवला पाहिजे की भगवंताकरिताच आम्ही जगतोय." कुणी नामाच्या वेळेला आला, तर त्याला सांगता आलं पाहिजे, की आत्ता माझ्या साधनेची वेळ आहे. यात लाज वाटता कामा नये. उगीच वेडेवाकडेपणा करू नये; पण खरंच असं वाटलं पाहिजे. त्याशिवाय साधन कसं होणार सांगा? सगळ्या अडचणीच आपण सांगत राहातो. असं करून चालणार नाही. गुरुसेवा अशी घडली पाहिजे!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या प्रवचनातून

पूज्य बाबा बेलसरेंच्या आठवणीतील मुकुटमणी! सत्शिष्य काय असतो...


श्रीराम. आजपर्यंत आपण परमपूज्य बाबा बेलसरेंच्या ज्या ज्या आठवणी पाहिल्या त्या सगळ्या आठवणींचा मुकुटमणी ठरेल अशी ही आजची आठवण आहे पू बापूसाहेब मराठेंनी सांगितलेली! सत्शिष्य काय असतो आणि पू बाबा यांच्यावर महाराजांचे निरतिशय प्रेम का होते याचा दाखला:

“महाराज, दृश्य खरं आहे, हा जो माझा भ्रम आहे, तो घालवा” असं पू बाबा मागे लागले होते महाराजांच्या १९४२ साली. “वेळ आली की घालवू” म्हणाले महाराज. १९४४ सालच्या एप्रिल मध्ये बॉम्बस्फोट झाला मुंबईत आणि मुंबईतून पळापळ सुरु झाली. जवळजवळ पाऊण मुंबई खाली झाली. त्या वेळी पू बाबांचं बिऱ्हाड होतं हिंदू कॉलनीत दादरला. आपण या परिस्थितीत काय करावं असा प्रश्न साहजिकच त्यांना पडला आणि दोघे पती-पत्नी याबद्दल महाराजांना विचारायला आले- “महाराज, या परिस्थितीत मी काय करू? हैदराबादला जाऊ का?” तसं महाराज म्हणाले, “केशवराव, मला असं वाटतं की तुम्ही इथे येऊन राहावं माझ्याजवळ. मी अशाकरता असं म्हणतोय की माझं जे होईल ते तुमचं होईल.” पू बाबांना फार आवडलं ते. पुढे महाराज म्हणाले, “वर दोन खोल्या रिकाम्या आहेत; त्यात तुम्ही येऊन राहावं असं मी सुचवतो.” आता महाराजांनी जबाबदारी घेतलीच होती. “महाराज, मी जरूर येतो” असं केशवराव म्हणाले. पण म्हणाले, “महाराज मी इथे येऊ कसा? म्हणजे समान केव्हा आणू? काय आणू?”, तेव्हा आधी महाराज म्हणाले, “एक दोन दिवसात समान आणावं” पण पुढे परत म्हणाले, “आपल्याला समान आणायचंच नाहीये! आता असं करायचं, कपड्यानिशी तुम्ही दोघांनी इथे यायचं. जी काही तुमची महत्त्वाची पुस्तकं असतील, ३-४ तेवढी घ्यायची आणि बाकीचा संसार लुटून टाकायचा!”

काय परीक्षा आहे ही! दृश्य जगाचा मोह – भान जे आहे ते लोपायला हा उपाय आहे. पू बाबांनी दुसरं तिसरं काही केलं नाही. गेले, त्यांची काय ३-४ महत्त्वाची पुस्तकं असतील ती घेतली आणि तसेच्या तसे दोघे नवरा-बायको मालाडला आले. गुरुआज्ञा अगदी तंतोतंत पाळली त्यांनी.

मात्र यायच्या आधी घर लुटवलं. हमाल बोलावले. जी.आय.पी. च्या स्टेशनवरून, सेन्ट्रल स्टेशन वरून हमाल बोलावले. समोर गरीब लोक राहात होते. त्यांना बोलावलं आणि घर लुटायला लावलं. १-१|| तासात सगळं लुटलं गेलं. मोकळं झालं सगळं. मग मालाडला आले आणि दोघेही नवरा-बायको महाराजांना भेटले. महाराजांना भेटल्यावर महाराजांना इतका काही आनंद झाला, “केशवराव, अहो, तुम्ही माझं ऐकलंत! आज मला इतका आनंद होतोय म्हणून सांगू! मला कसा आनंद होतोय सांगू का? एक उस्ताद असतो गाणं शिकवणारा. उस्ताद आपल्या शिष्याला गाणं शिकवीत असतो. गाणं शिकवता शिकवता त्यांना तान शिकवायची असते. एक तान, दुसरी तान, तिसरी तान अशा तो ताना शिकवीत असतो. हे शिकता शिकता एक तान शिष्य गुरूपेक्षाही चांगली घेतो. शिष्य तयारीचा असला ना तर असं होतं कधी कधी. आणि शिष्याने आपल्यापेक्षा चांगली तान घेतल्यावर उस्तादाला ज्या गुदगुल्या होतात, त्या मला आत्ता होतायत. आणि केशवराव, तुम्ही माझं का ऐकलंत सांगू का? मी माझं घर आधी लुटवलं आहे म्हणून तुम्ही माझं ऐकलंत. नाहीतर माझ्या वाणीला धारच नव्हती. मला तुम्हाला सांगायला तोंडच नव्हतं. मी आधी केले मग सांगितले. आता तुमचा दृश्यावरचा मोह जाईल. अनुभव घ्या. आता कसा लय लागतो ते बघा नामात!” केवढी कृपा झाली!

आता पू बापूसाहेबांनी बाबांना आणि वहिनींना काय विचारलं, “अहो, तुमचं धारिष्ट कसं झालं?” त्या दोघा नवरा-बायकोंनी त्यांना सांगितलं, “बापूसाहेब, सौदा फार स्वस्त होता. अहो, दृश्यावरचं भान जाणं ही काय कमी कृपा आहे का? त्याला घर लुटवणं ही प्राईस जुजबी होती. म्हणून त्याला आम्ही तयार झालो. असा मोका पुन्हा येणारे कधी? आता संधी आली याचाच अर्थ आज्ञा आहे आणि त्यांच्या कृपेने आम्ही ती संधी घेतली. आम्ही अगदी आनंदात आहोत!”

असे होते आपले पू बाबा! heart emoticon

खरा भाग्योदय!

|| श्रीराम समर्थ ||


मला जर कुणी तयार करील तर तूच करशील!



श्रीराम. एकदा बोलताना महाराज काय म्हणाले, प्रपंचात सारखं भान ठेवलं पाहिजे की हे जे सगळं सगळं आहे, जे घडतं आहे, ते मला शिकवण्याकरता आहे. हे केलं ना तर म्हणाले सगळं जे तत्त्वज्ञान आहे ते आचरणात येईल.

आचरणात येईल म्हणजे काय होईल असं विचारताच पहिल्या धडाक्याला त्यांनी सांगितलं बघा- त्यांचे शब्द सांगतो- "माझं वागणं असं पाहिजे की माझ्या गुरूला कमीपणा येता कामा नये!"

यावर आम्ही काय म्हटलं, "महाराज, हे आम्हाला कसं काय शक्य आहे? सारखंच आपल्या उलट वागतो आम्ही!" तेव्हा ते काय म्हणाले, "गुरूचं जर खरं सामर्थ्य असेल, किंवा कृपा म्हणा, अशाला तयार करणं याच्यातच आहे!" वा! कोण भेटेल असं तुम्हाला नाही का? मला सूरदासाचं पद आठवतं बघा- "कै मुख लै बिनती करूँ"... हे कोणचं तोंड घेऊन मी तुला विनंती करू?

पुढे महाराज काय म्हणाले, "याला सोपा उपाय आहे. गुरूला म्हणावं, "मी आहे हा असा आहे; पण मला तुझ्याशिवाय दुसरं कुणी नाही. मला जर कुणी तयार करील तर तूच करशील. एवढी बुद्धी ठेवावी आणि त्याला सोडू नये. तो करतो!" 💗🙏

~ परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या प्रवचनातून

नाम स्थिर का होत नाही? नाम वाढत का नाही?


श्रीराम. नाम कसेही घेतले तरी आपले काम करतेच. हे जरी खरे असले, तरी "जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी" हे देखील खरे. आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडतो की 'माझे नाम वाढत का नाही?' पूज्य बाबांनी तर याचे कारण सांगून ठेवलेच आहे, की नाम सूक्ष्मातले असल्यामुळे त्याला लागणारी शक्ती ही अध्यात्मिक शक्ती आहे, बुद्धीची शक्ती नाही आणि म्हणूनच नाम घ्यावेसे वाटते पण होत नाही ही तक्रार बऱ्याच जणांची असते. त्याची अजून काही कारणे आहेत का?
{ हे सातारा येथील नाम-शिबिरात (संतछाया) संकलित झाले आहे }
नाम स्थिर का होत नाही? नाम वाढत का नाही?
कारण,
१) नाम वाढावेसे वाटणे अनेकदा वरवरचे असते.
२) नाम घेणे यांत्रिक असते; भावपूर्ण नसते.
३) नाम घेण्यात सातत्य कमी पडते.
४) आजाराच्या प्रमाणात औषध नगण्य असते.
५) नाम हा भगवंताचा संकेत म्हणून घेत नाही.
६) नामाचे आपल्या जीवनातील स्थान / महत्त्व आपण वाढवत नाही.
७) नाम घेण्यात निःशंकपणा नाही.
८) नाम घेण्यापासून लौकिक अपेक्षा असतात.
९) नाम वाढण्याच्या आड कुणी काही असल्याची समजूत कायम असते.
१०) नामाला उपाधी लावतो.
११) इतर सत्कर्मे ओढवून घेतो.
१२) नामाच्या अनुभवाची अपेक्षा बाळगतो.
१३) नाम वाढण्याला अनुकूल कामे करत नाही.
१४) नाम वाढण्याला प्रतिकूल कामे कळत नकळत करतो.
१५) मौनाचा अभ्यास कमी पडतो.
१६) नाम घेण्यास सबबी सांगतो.
१७) तुलनेत घालवतो.
१८) 'मी आहे तसाच राहून' नाम वाढावेसे वाटते.
१९) नामाचा संपूर्ण अर्थ 'मी नाही तू आहेस' हे सतत लक्षात ठेवून नाम घेत नाही; व्यवहार करत नाही.
२०) नामाच्या साठवणीतून सतत उचल करीत असतो.
२१) सावधानता, अभ्यास, नम्रता कमी पडतात.

साधकाला मृत्यूचे निरोगी भान हवे!


श्रीराम. डॉ अप्पासाहेब आठवले यांनी पूज्य बाबांना विचारले, "तुमचे साधन काळातील काही अनुभव सांगा." पूज्य बाबा काहीच बोलले नाहीत. थोड्या वेळाने म्हणाले की साधन करत असताना मला उपयोगी पडलेल्या काही गोष्टी सांगतो; त्या लक्षात ठेवा.

आता माझे वय झालेले आहे. मृत्यू केव्हाही येऊ शकतो. आता साधन करावयास थोडेच दिवस राहिले आहेत असे वाटू लागले, म्हणजेच मृत्यूचे निरोगी भान ठेवले की साधनाला जोर येतो. मृत्यूची तशी भीती नाही; पण I am counting my days.

मृत्यूची भीती वाटत नसली तरी आजार झाला तर साधन होणार नाही. परालीसीस झाला, स्मृती गेली असे काही होऊ शकते. गेल्या वर्षी गुडघ्यात पाणी झाले तेव्हा आठ दिवस झोप नव्हती. जागचे हलता येत नसे. घरातील बाकीची सर्व मंडळी झोपलेली असत. अशा वेळी केवळ नामानेच साथ दिली. त्यामुळे तेव्हापासून आता हे जास्त वाटू लागले आहे. आज हाताशी आहे तो दिवस खरा हे लक्षात ठेवून शक्य तितके जास्त साधन आजच केले पाहिजे!

~~ अध्यात्म संवाद ४

नामाच्या संगतीनं आणि त्याला सर्वोच्च मूल्य दिल्यानं प्रपंचाची बोच जाईल!



श्रीराम. एक दिवस गुरुदेव रानडे आंघोळीहून बाहेर आले. त्यांच्या भाच्यानी त्यांना सांगितलं की, सांगलीचा राजा पुस्तकासाठी (Mysticism in Maharashtra) पैसे द्यायला आलाय. गुरुदेव म्हणाले, "मी आंघोळीहून आल्यावर कशा अवस्थेत असतो, ते तुला माहीत नाही का? त्याला ९/९|| वाजता यायला सांग. १९४२ सालची ही गोष्ट; राजासमोर असं बोलायचं म्हणजे काय हो? पण साधनेची किंमत त्यापेक्षा मोठी आहे ना!

तुम्ही या मार्गाला लागता तेव्हा ते साधन प्राण आहे असं वाटलं पाहिजे. There should not be any compromise. कोणतीही तडजोड नाही! त्याकरता दृश्याचं प्रेम सुटलं पाहिजे. दृश्यात राहावं लागेल पण त्याची किंमत ओळखून राहायला हवं. जसं जर्मन तत्त्वज्ञ कान्ट म्हणतो, 'Duty for duty's sake'. कर्तव्य म्हणजे ज्या माणसाशी जो संबंध तितकीच त्यांना किंमत द्यावी. अमेरिकेला मुलं जातात; बोलावलं तरी येत नाहीत. तेव्हा वाईट वाटण्याऐवजी मी माझं कर्तव्य केलंय, ठीक आहे असं वाटलं पाहिजे. त्या कर्तव्यात भगवंताचं स्मरण असेल तर चांगलंच. समाधान राहील. ईश्वरावर श्रद्धा असल्याखेरीज तुम्ही कर्तव्य कर्तव्यबुद्धीनं करूच शकणार नाही. व्यवस्था ठेवणारा देव आहे. देह आहे तोपर्यंत प्रपंच राहणारच. त्याची बोच जायला नामाची संगत ठेवायला हवी. संगत म्हणजे, भेटून गेलेल्या माणसाबद्दल जसं वाटतं, तसं नाम घेऊन झाल्यावर संगत झाली असं वाटतं का?

श्रीमहाराज म्हणतात, नाम हा माझा प्राण आहे, तर तुम्हाला तसं वाटतं का? सगळं मर्म तिथेच आहे! मुंबईला चोऱ्या पुष्कळ होतात. पाकीट जाऊ नये म्हणून आपण त्याची संगत कशी ठेवतो? तशी नामाची राहते का? इतर वेळेला सुद्धा 'ते आहेत' ही भावना असल्याशिवाय नामाची संगत घडणार नाही. त्यातलं मर्म-- "ज्याला मी पाहतो आहे असं वाटतं, त्याच्या हातून दुष्कर्म होणारच नाही!"

~~ परमपूज्य बाबा बेलसरे