Translate

Monday, September 21, 2015

नाम हीच अंतकाळची वासना व्हावी!


श्रीराम. श्रीमहाराजांना जे आवडायचे नाही ते करू नये. त्यांना जे शोभेल व जे आवडेल असं वागायला हवं. त्याकरिता अखंड नाम घेणे हाच उपाय आहे आणि प्रार्थना करावी की 'मी नाम घेतोय' हा माझ्या मनाचा दोष काढून टाका. त्याने शांती वाढेल. प्रत्येक नामागणिक शांतीचा अनुभव येईल.
श्रीमहाराज अंतकाळ साधायचे म्हणजे, प्रपंचाची वासना मरताना समोर यायला लागली तर तिच्या जागी नामाची वासना घालायचे. तर मग आपण अखंड नामाचीच वासना ठेवली तर पुढच्या जन्मात डबल प्रमोशन देऊन नाम घ्यायला सोईचं होईल अशाच ठिकाणी जन्माला घालतील. या जन्मातल्या वासना पुढच्या देहाची वाट पाहत असतात. पण संचितातून फलोन्मुख झालेली कर्मे भोगायला आवश्यक असणारा देह तयार असतो. जोपर्यंत संचित सूक्ष्म आहे तोपर्यंत त्यात बदल करता येतो. पूर्वसंस्काराने मनाचे व्यवहार चालतील पण त्यानुसार वागावं की नाही ते आपल्या हातात असतं. माणसाला व्यवहाराकडे बघायची दृष्टीच बदलायला हवी; म्हणजे सृष्टीच वेगळी दिसेल.
नामाला सर्वोच्च मूल्य दिल्याने आपली दृष्टीच बदलते, Dimension च बदलून जातं. नामाशिवाय राहा म्हटलं तर ते आता शक्य नाही असं वाटतं!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे

नामात नित्य नवा ताजेपणा हवा!


श्रीराम. नाम सवयीचे होता कामा नये. पूजा करताना कुठे आपले संपूर्ण लक्ष असते? तसे होऊ नये. त्यात नित्य ताजेपणा पाहिजे. कासेगांवकरांना नामाबद्दल सांगताना महाराजांना बोलवेना. त्यांचा घसा दाटून आला. इतके नामाचे महत्त्व आहे. भाऊसाहेब दर तास - अर्धा तासाने महाराज कोठे आहेत, काय करताहेत ते पाहून यायचे, तसे नामाचे अनुसंधान पाहिजे. गुरू देहात असताना त्याची सेवा करता येते पण ते देहात नसतानाही तोच भाव पाहिजे. त्याचबरोबर आपले आचरण आणि विचारही शुद्ध झाले पाहिजेत. वाईट बोलू नये. एकदा श्रीमहाराज म्हणाले, ज्या तोंडाने भगवंताचे नाव घ्यायचे त्याने अपशब्द उच्चारणे योग्य नाही. आपले मन आणि वाणी पवित्र पाहिजे. यासाठी ध्येयाची सतत आठवण- सावधानता हवी. रोज झोपण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे

नामदेवांची भक्ती आणि आपली!

श्रीराम. कृष्णदास नावाचा महाराजांचा एक भक्त वरचेवर महाराजांकडे (वाणी रूपात असताना) येत असे. त्याचे म्हणणे असे की, "नामदेवाने जसे श्रीविठोबास दूध पाजले, तसे माझ्या हातून प्यावे." श्रीमहाराज म्हणाले, "दोघांत फरक इतकाच की, देव दूध पितो याची नामदेवास खात्री होती; पण माझे हातून पीत नाही याचे दुःख होते. तुला देव दूध पीतच नाही पण माझेकडून त्याने प्यावे असे वाटते आहे. आपण कोणताही आग्रह न धरता अखंड त्याचे स्मरणात असावे यातच खरे कल्याण आहे. नामस्मरण करीत जावे." त्याप्रमाणे मग तो नामस्मरण करीत असे!
~ परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांचे आत्मवृत्त

गुरुकृपा आणि नामाचे महत्त्व विषद करणारा संत निवृत्तीनाथांचा एक गोड अभंग!


गुरुकृपा आणि नामाचे महत्त्व विषद करणारा हा संत निवृत्तीनाथांचा एक गोड अभंग!
अंधारिये राती उगवे हा गभस्ति |
मालवेना दीप्ति गुरुकृपा ||
तो हा कृष्ण हरि गोकुळा माझारी |
हाचि चराचरी प्रकाशला ||
आदि मध्य अंत तिन्ही झाली शून्य |
तो कृष्णनिधान गोपवेषे ||
निवृत्ति निकट कृष्णनामपाठ |
आवडी वैकुंठ वसिन्नले || heart emoticon
~ रात्र अंधारी आहे; परंतु गुरुकृपेने अंधाऱ्या रात्रीदेखील सूर्य उगवला आहे. त्याचा प्रकाश कधीही मंद होत नाही. तो सूर्य म्हणजेच गोकुळीचा कृष्ण होय! तोच प्रकाशरूपाने चराचरामध्ये प्रकाशला आहे. या प्रकाशाच्या ठायी आरंभ, मध्य आणि अंत असे काहीच राहिले नाही. हा प्रकाशच गोपवेषात नटलेल्या कृष्णाचे निधान (घर) आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, या कृष्णनामाचा जप माझ्या जवळ आहे. या नामाच्या आवडीने जणू काय माझे जीवनच वैकुंठ झाले आहे!

नामस्मरणाचे महत्त्व आणि त्याचे भगवंताशी एकरूपत्व!

श्रीराम. नामस्मरणाचे महत्त्व आणि त्याचे भगवंताशी एकरूपत्व सांगणारा तुकोबांचा एक सुंदर आणि मार्मिक अभंग-
काय करू कर्माकर्म | बरे सापडले वर्म ||
होसी नामाच सारिखा | समजाविली नाही लेखा ||
नाही वेचावेच झाला | उरला आहेसी संचला ||
तुका म्हणे माझे | काय होईल तुम्हा ओझे ||
~ आपल्याला माहीतच आहे की तुकोबांसारखी देवाशी सलगी क्वचितच पाहायला मिळते. त्यांच्या अभंगांतून आपण त्याचा वारंवार प्रत्यय घेऊ शकतो. एक अविचल भक्तच अशी सलगी दाखवू शकतो जी दास्य भावातून सख्य भावाकडे वाटचाल करते. अशीच एक गोड सलगी या अभंगात-
भगवंता, मी कर्म आणि अकर्म यांचा विचार कशाला करू? कर्माचे व अकर्माचे जे मुख्य वर्म आहे- ते तुझे नाम- माझ्या हाती आले आहे! तुझे नाव दीनदयाळ आहे आणि त्या नावासारखाच तू दयाळू आहेस हे मी जाणतो. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी तुझ्या नामाचा आश्रय घेतला, त्यांना तू त्यांच्या इच्छेप्रमाणे दिलेस आणि त्यांचे समाधान केलेस. तुझे नाम पूर्वी जे होते ते तसेच आत्ताही आहे. त्यात काहीही वजा झालेले नाही. तू जसा आहेस तसाच पूर्ण आहेस. तेव्हा माझा अंगीकार केल्याने तुला ओझे होणार आहे का? (तेव्हा तुझ्या नामाला जागून तू मला आपले म्हटलेच पाहिजेस!)

Similarity between the teaching of two saints- 2

आजच्या आपल्या अवस्थेमध्ये 'मी ब्रह्म आहे' असे म्हणणे बरोबर नव्हे! ~ श्रीमहाराज
I say, 'Thou art my Lord and I am Thy servant.' ~ Shri Ramakrishna Paramahans
~श्रीमहाराज~
श्रीराम. एका शास्त्रीबुवांनी श्रीमहाराजांना विचारले, "मी तुझा दास आहे असे सारखे म्हणत गेल्याने गुलामवृत्ति वाढणार नाही काय?" त्याऐवजी 'मी ब्रह्म आहे' असे आपण का म्हणू नये?' श्रीमहाराज म्हणाले, "ज्ञानमार्ग असो की भक्तिमार्ग असो, खरा 'मी' कोण आहे हे ओळखण्यासाठीच सर्व साधने असतात. आज आपल्याजवळ खोट्या 'मी' चे प्राबल्य आहे. ते नाहीसे करणे जरूर आहे. खोटा 'मी' गेला म्हणजे खऱ्या 'मी' ला कुठून बाहेरून आणण्याची जरूर नाही. तो प्रत्येकाच्या अंतःकरणात स्वतःसिद्ध आहेच. म्हणून खोट्या मी ला मारण्यासाठी भगवंताचे - जगाचे नव्हे - दास्यत्व पत्करणे फार अवश्य असते. आजच्या आपल्या अवस्थेमध्ये 'मी ब्रह्म आहे' असे म्हणणे देहबुद्धीला वाढवील. ते बरे नव्हे. 'मी ब्रह्म आहे' या अनुभवातसुद्धा मीपण आहे. नाम त्याच्याही पलीकडे आहे; म्हणून फक्त नाम घ्यावे! heart emoticon
~Shri Ramakrishna~
There is a saying, 'I don't want to become sugar; I want to eat it.' Therefore, I never feel like saying, 'I am Brahman.' I say, 'Thou art my Lord and I am Thy servant.' My desire is to sing God's name and glories. It is very good to look on God as the Master and on oneself as His servant. Further, you see, people speak of waves as belonging to the Ganges but no one says that the Ganges belongs to the waves. The feeling 'I am He' is not wholesome. A man who entertains such an idea, while looking on his body as the Self, causes himself great harm. He cannot go forward in spiritual life; he drags himself down. He deceives himself as well as others. he cannot understand his own state of mind. Unless one has learnt to love God, he cannot realize Him. I never ask Divine Mother to give me anything. I pray to Her only for Pure Love- 'शुद्धा भक्ति!' heart emoticon

नामाचा अभ्यास चिकाटीने करावा!


श्रीराम. साधनेत एक लक्षात ठेवणे जरूर आहे की आरंभापासून शेवटपर्यंत नामाशिवाय दुसरे काही करावे लागत नाही. काळ अनुकूल असो किंवा प्रतिकूल, साधकाने चिकाटीने नाम घ्यावे.
महाराजांपाशी एक कर्नाटकी मनुष्य येऊन राहिला. त्याचे इतर वागणे चार सामान्य लोकांसारखेच होते. परंतु नामस्मरणाच्या बाबतीत त्याने वैशिष्ट्य दाखवले. तो अहोरात्र नामस्मरण करीत असे. त्याच्या तोंडात नाम व हातात माला केव्हाही दिसे. काही दिवसांनी त्याच्या मनाला अत्यंत समाधान प्राप्त झाले. गोंदवल्यासच त्याचा अंतकाळ झाला. प्राण गेल्यानंतर देखील काही वेळ त्याचे ओठ, बोटे सारखी हलत होती. संध्याकाळची वेळ असल्यामुळे महाराजांनी एक मेणबत्ती घेऊन त्याचे थिजलेले डोळे लोकांना मुद्दाम दाखवले आणि म्हणाले, "याला म्हणावे अभ्यास! पूर्वाभ्यासाने देहाला इतकी सवय लागते की तो प्राणहीन झाल्यावर देखील ओठ बोटे हालू शकतात. मग मन तर सूक्ष्मच आहे. त्याला नामाची सवय लवकर लागेल. ती जर टिकवून धरली तर या जन्मीच काय पण पुढेदेखील ती कायम टिकेल!"
पण चिकाटी मात्र हवी!
आनंदसागरांची नामनिष्ठा जबर होती. लग्न करायचे त्यांच्या मनात नव्हते. गुरूंनी त्यांचे लग्न ठरवले, त्यावेळी त्यांना रडू कोसळले. लग्नाच्या दिवशी पहाटे तीन वाजता उठून त्यांनी गार पाण्याने स्नान केले आणि सकाळी सहा वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे मनापासून नामस्मरण केले! तसेच उदाहरण गुरुदेव रानडे यांचे. ज्या दिवशी एम ए ची परीक्षा होती, त्या दिवशी पहाटे उठून त्यांनी आपले रोजचे नामस्मरण पूर्ण केले. तसेच ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला, त्या दिवशी देखील त्यांनी आपला नेम चुकवला नाही!
~ परमपूज्य बाबा बेलसरे (सहज-समाधी-सारांश)

वासना पायरी पायरीने शुद्ध करावी!



श्रीराम. कमी-जास्त प्रमाणात व चांगली वा वाईट वासना सर्वसामान्यांच्या मनात असतेच. पण ती अधिकाधिक प्रमाणात शुद्ध, सात्विक व उदात्त करण्याचा प्रयत्न माणसाने करावा असे सांगून श्रीमहाराज म्हणाले,
"पापवासना अथवा वाईट विचार मनात येत राहून त्यानुसार लगेच देहाने कुकर्म घडणे हा सर्वात खालचा, तामसी प्रकार होय. अशांच्या ठायी विवेक ही वस्तू अस्तित्वातच नसते.
त्यापेक्षा वरच्या दर्जाचे ते की ज्यांच्या मनात वाईट विचार येतात पण त्यांना संयमाने आवर घालून ते कुकर्म ते प्रत्यक्षात घडू देत नाहीत. हा रजोगुणी प्रकार म्हणता येईल.
याहून श्रेष्ठ, सात्विक वृत्तीचे जे असतात त्यांच्या मनात वासना येतात त्या सर्व सात्विक, परहितकारक अशाच असतात; त्यात पापसंकल्पना मुळीच नसते. वासनांचा सर्वोच्च व शुद्ध सात्विक प्रकार म्हणजे सद्गुरू आणि भगवंत यांच्याखेरीज काहीही विचार मनात न येणे. संत व सिद्ध पुरुष हे असे असतात.
सतत नामस्मरणात राहिले म्हणजे माणूस आपोआप या पायऱ्यांनी वर चढत चढत श्रेष्ठत्वास पोचतो!"
(हृद्य आठवणी)

Similarity between the teaching of two saints - 1





श्रीराम. रामाला साक्ष ठेवून सांगतो की माझ्याशी आपलेपणा ठेवा. मला आवडते म्हणून नाम घ्या. तुमच्या पापाचा भार मी घेतला अशी खात्री बाळगा. ते पाप पुनः करु नका, तुम्हाला रामाच्या चरणाशी नेण्याची हमी माझ्या कडे लागली.
नामाची सत्ता फार बलवत्तर आहे. जगामध्ये असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल.
~~ श्रीमहाराज

तळमळीने आपण नाम घेतो का?


श्रीराम. एखाद्या परीक्षेची तयारी आपण कशी करतो? खाता जेवता उठता बसता अभ्यास करतो, पुस्तकं वाचतो. परीक्षा केंद्रावर सुद्धा वाचन चालू असतं. चांगले गुण मिळावण्यासाठी किती कष्ट घेतो? हे दृश्यातलं असून सुद्धा! मग अदृश्य ईश्वर दर्शनाला किती तळमळ हवी? या तळमळीने आपण नाम घेतो का? असे झाल्यास भगवद्दर्शन दूर नाही!
~ परमपूज्य बाबा बेलसरे (प्रवचन)

संत कबीराचा ईश्वर प्रेमाने मस्त असा एक दोहा!

हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या |
रहे आज़ाद या जग में, हमन दुनियासे यारी क्या? ||१||
जो बिछुड़े है पियारेसे, भटकते दर ब दर फिरते |
हमारा यार है हम में, हमन को इंतजारी क्या? ||२||
खलक सब नाम अपने को, बहुत कर सर पटकता है |
हमन हरिनाम रांचा है, हमन दुनियासे यारी क्या ||३||
न पल बिछुड़े पिया हमसे, न हम बिछुड़े पियारेसे |
उन्हीसे नेह लागा है, हमन को बेकरारी क्या? ||४||
कबीरा इश्क का माता, दुईको दूर कर दिलसे |
जो चलना राह नाजुक है, हमन सर बोझ भारी क्या? ||५||
~~ मी प्रेमामध्ये मस्त आहे. मला कशाची शुद्ध असली काय किंवा नसली काय? मी या जगात मुक्तपणे राहात असतो. मला जगाशी आसक्ती ठेवून काय करायचे आहे? ज्याचा आपल्या प्रियकराशी वियोग झालेला असतो, तो दारोदार भटकतो. पण माझा प्रियकर माझ्यामध्येच आहे, म्हणून मला कोणाची प्रतीक्षा करण्याचे कारणच नाही. सारी दुनिया आपले नाव व्हावे म्हणून धडपड करते. पण *** मी हरिनामावर अनुरक्त आहे ***. म्हणून मला दुनियेशी दोस्ती ठेवण्याचे प्रयोजन नाही. माझा प्रियकर माझ्यापासून क्षणभर सुद्धा वेगळा होत नाही. तसाच मीही माझ्या प्रियकरापासून कधीच वेगळा होत नाही. माझे त्याच्याशीच पूर्ण प्रेम जडले आहे. म्हणून मला बेचैन अवस्था माहीत नाही. कबीर सांगतात, मी हृदयातून द्वैत बाजूला सारले आणि भगवंताच्या प्रेमामध्ये मस्त झालो. जर नाजूक मार्गावर चालायचे असेल तर डोक्यावर मोठे ओझे घेऊन कसे चालेल? चालणार नाही!

गुरुभक्ती कशी असावी हे श्रीरामकृष्ण परमहंसांच्या शब्दात!



श्रीराम. अत्यंत एकनिष्ठ भक्ताला आपल्या गुरूविषयी प्रेम वाटेलाच, पण गुरूचा एखादा नातेवाईक अगर गुरूच्या गावचा एखादा मनुष्य भेटला, तरी एकदम गुरूची आठवण होऊन, त्यालाच गुरू म्हणून तो नमस्कार करील! भक्ताची गुरुभक्ति इतक्या उच्च अवस्थेला पोहोचली म्हणजे त्याला आपल्या गुरूत एकही दोष दिसत नाही. गुरू जे सांगतील ते त्याला प्रमाण. त्याची दृष्टीच तशी होऊन जाते. कावीळ झालेल्या माणसाला जसे सर्व काही पिवळेच दिसते, तसे त्याचे होऊन जाते.
गुरुभक्ति कशी असावी सांगू?
गुरू जसे सांगेल तसे लागलीच दिसू लागले पाहिजे. अशी भक्ति अर्जुनाची होती. एक दिवस रथात बसून अर्जुनाबरोबर श्रीकृष्ण सहज फिरत चालले असता मधेच आकाशाकडे पाहून म्हणाले, 'अहाहा! अर्जुना, हे पाहिलेस का? कसे एक सुंदर कबूतर उडत चालले आहे ते!' आकाशाकडे पाहून अर्जुन लागलीच म्हणाला, 'खरंच, कृष्णा, किती सुंदर कबूतर आहे हे!' पण पुन्हा श्रीकृष्ण वर पाहून म्हणाले, 'छे छे अर्जुना! अरे हे कबूतर नव्हे!' अर्जुन तिकडे पाहून पुन्हा म्हणाला, 'खरेच कृष्णा! अरे हे तर कबूतर दिसत नाही!'
आता आपण लक्षात घ्या की अर्जुन महान सत्यनिष्ठ, उगीच कृष्णाची खुशामत करण्यासाठी तर तो असे म्हणाला नाही! पण कृष्णाच्या शब्दावर त्याचा इतका विश्वास आणि भक्ति की, कृष्णाने जे काही सांगितले ते अर्जुनाला अगदी तसेच दिसू लागले!
अशा रीतीने गुरुभक्तिपरायण साधक अखेरीस अशा अवस्थेला जाऊन पोहोचतो की, त्या वेळी ही शक्ती त्याच्या स्वतःमध्येच आविर्भूत होऊन, त्याच्या मनातील सर्व संशयाचा उलगडा करून गूढ गूढ अध्यात्मिक तत्त्वे त्याला समजावून देते!

आत्मस्वरूप प्रकट होऊ लागले, म्हणजेच तोंडात नाम येते!


श्रीराम. आपल्याला नामस्मरणाचे खरे महत्त्वच कळत नाही. नामस्मरण हाच खरा धर्म, हेच खरे कर्म आणि हीच खरी उपासना होय. नामस्मरणानेच आत्मदर्शन घडते यात शंकाच नाही. मनापासून नाम घेणे हेच साधकाचे खरे जीवन आहे. नामाची कृपा होणे हे भाग्यवंताचे लक्षण आहे. नामस्मरण करावे असे वाटणे हीच ती कृपा होय.
**** आत्मस्वरूप प्रकट होऊ लागले, म्हणजेच तोंडात नाम येते ****
म्हणून नामस्मरण हेच खरे तप होय!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (नामसमाधी : सहज-समाधी)

संताचा आनंद निर्मळ व निस्वार्थी असतो!



श्रीराम. श्रीमहाराजांना भेटायला गेले असता भेटणाराला तर आनंद होईच, पण त्याच्याहूनही अधिक आनंद त्यांनाच झाल्याचे दिसून येई. याचे कारण एका ज्येष्ठ भक्ताने विचारले असता ते म्हणाले, "आपण कितीही निर्मळ मनाने भेटायला गेलो, तरी आपली देहबुद्धी नष्ट झालेली नसल्यामुळे, प्रपंचातली काही अडचण-उणीव दूर व्हावी, निदान आहे ही सुस्थिती कायम राहावी, अशी एक चोरटी, सूक्ष्म इच्छा मनात कुठेतरी खोल दडलेली असतेच, त्यामुळे आपल्याला होणारा आनंद निर्भेळ, सात्विक, निरुपाधिक नसतो; वासनेने डागाळलेलाच असतो.
याउलट, येणारा प्रत्येक जीवात्मा बद्धावस्थेतून मुक्त व्हावा, त्याला भगवंताची भेट होऊन शाश्वत समाधान लाभावे, ही एकच सात्विक, निस्वार्थी तळमळ मनात असल्याने श्रीमहाराजांना होणारा आनंद निरुपाधिक, विशुद्ध प्रेमाचा, करुणेने ओतप्रोत असा असतो. आपल्यालाही सद्गुरूभेटीचा, संतदर्शनाचा असा आनंद हवा असेल, तर आपण अशा निर्मळ भावनेने गेले पाहिजे की माझ्या देहाचे आणि प्रपंचाचे काहीही होवो, मला भगवंताचे खरे प्रेम लागून जन्ममरणाचा फेरा चुकावा!"
(हृद्य आठवणी)