Translate

Friday, July 3, 2015

भगवंताची कृपा म्हणजे काय?


श्रीराम. भगवंताची कृपा म्हणजे संतांनी रचलेली संकल्पना नाही. त्यांच्या आत्मबुद्धीला घडलेले ते एक साक्षात दर्शन आहे. जीवनाकडे समग्रपणे पाहता आले - म्हणजे अहंकारशून्य होऊन पाहता आले - तर भगवंताची कृपा ही काय वस्तू आहे याचा अंदाज येतो. नामस्मरणाने ही समग्रपणाची दृष्टी नकळत प्राप्त होते. कृपापात्र माणसाच्या जीवनात सुखदुःखाचे प्रसंग आल्यावाचून राहात नाहीत. पण प्रत्येक प्रसंगामध्ये एक जबरदस्त कल्याणकारी शक्ती आपल्याला सांभाळते असा प्रत्यक्ष अनुभव त्याला येतो. जीवनामध्ये काहीही उलथापालथ झाली, तरी भगवंतापासून, त्याच्या नामापासून मन न चळणे ही कृपेची सर्वोत्तम प्रचीती होय. वासनेचा आघात क्षीण होणे, दृश्याला चिकटलेले मन तेथून सुटून भगवंताला तितकेच दृढपणे चिकटणे आणि भगवंताच्या नामाची गोडी उत्पन्न होणे यांमध्ये भगवंताच्या कृपेचे साधनी माणसाला दर्शन घडते. किंबहुना या दर्शनामध्ये नामस्मरणाचे फळ साठवलेले आहे असे म्हणणे अनुभवला अधिक धरून आहे.

भगवंताच्या कृपेचे भान प्राप्त झालेला साधनी माणूस नित्यकर्मे करताना सामान्य माणसासारखा दिसतो. परंतु लहान सहान प्रसंगामध्ये देखील "हा आपल्यातील नव्हे" असे निकटवर्तीयांच्या ध्यानात आल्यावाचून राहात नाही.

नाम घेणाऱ्याने हे ध्यानात ठेवावे की कृपेची जाणीव साधनी माणसाला भगवंताच्या अति निकट घेऊन जाते. त्यावेळी नामाची सांगत म्हणजे काय याचा अनुभव येतो. तेथे भगवंताची दिव्य वाणी अनाहतनादरूपाने ऐकायला येते. इतकेच नव्हे तर भगवंताच्या ऐक्यासनावर बसण्याचे भाग्य लाभते!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (भगवंताच्या नामाचे दिव्य संगीत)

तितिक्षा सा निगद्यते!!!


श्रीराम. माणसाचे मन विश्वमनाचा अंशच असल्याने त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती असते. लोकांचा द्वेष आणि निंदा करण्यात आपण विनाकारण तिचा व्यय करतो. म्हणून आपण तर कधी द्वेष किंवा निंदा करू नयेच पण कोणी आपली निंदा केली तर ती आनंदाने किंवा विनोदाने सोसावी. उदाहरणार्थ :

एक चांगला साधक रस्त्याने चालला होता. त्याची निंदा करणारा मनुष्य वाटेत भेटला. साधकाने मोठ्या प्रेमाने त्याचे स्वागत केले. निंदक बरोबर चालू लागून त्याची वाटेत तो निंदा करू लागला. मोठ्या प्रसन्नतेने साधकाने त्याचे बोलणे ऐकून घेतले. इतक्यात तो थांबला आणि निंदकाला म्हणाला, "मित्रा, तुला आणखी जे काही बोलायचे ते बोलून घे. मी येथे उभा राहतो. पुढे माझ्यावर प्रेम करणारे लोक राहतात. ते तुला त्रास देतील.." निंदक चुपचाप न बोलता निघून गेला.

मलिक नावाचा एक तपस्वी होता. त्याचे अंतःकरण लहान मुलाप्रमाणे सरळ होते. एके दिवशी तो रस्त्याने जात असता "ए बदमाष" म्हणून एका बाईने त्याला हाक मारली. अत्यंत नम्रतेने त्याने उत्तर दिले, "बाई, इतक्या दिवसात माझ्या खऱ्या नावाने हाक मारणारी तूच प्रथम भेटलीस. तू मला बरोबर ओळखलेस म्हणून आनंद वाटला. भगवंताला विसरून जगणे बदमाषीच आहे."

दक्षिणेत व्यंकटनाथ नावाचा मोठा भक्त होऊन गेला. तो फार विद्वान होता. त्याचा द्वेष करणाऱ्या मंडळींनी एक दिवस जुन्या जोड्यांची मोठी माळ त्याच्या दारात टांगून ठेवली. ती अशी टांगली की जो कोणी आतून बाहेर येईल त्याच्या डोक्याला ती बरोबर लागावी. व्यंकटनाथ जेव्हा बाहेर आला, तेव्हा त्याच्या डोक्याला ती लागली. ते पाहून सगळे हसले. पण अगदी शांतपणे व्यंकटनाथाने पुढील श्लोक म्हटला: "कर्मावलंबकाः केचित् केचित् ज्ञानावलंबकाः| वयं तु हरिदासानां पादरक्षावलंबकाः ||" म्हणजे- "काही लोक कर्ममार्गाने जातात, काही ज्ञानमार्गाने. पण आम्ही मात्र हरिदासांच्या म्हणजे भगवद्भक्तांच्या जोड्यांचे अनुयायी आहोत. आमच्यावर आज खरोखर भगवंताची कृपा झाली."

तात्पर्य- साधकाच्या अंगी विवेकाने आलेली नम्रता हवी. नम्रतेशिवाय कोणी संत होऊ शकत नाही; संत आणि नम्रता एकाच जीवनाच्या दोन बाजू आहेत!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (सहजसमाधी)

नामाच्या अभ्यासानेच नामाचे प्रेम लागेल !!


एका नामधारकाने श्रीमहाराजांना विचारले की, 'लहान मुलाला जर चहाचे बोट लावले तर ते दुधाकडे दुर्लक्ष करते, कारण त्याला चहाची चटक लागते. तशी नामाची आम्हाला चटक आपण का लावीत नाही?'

श्रीमहाराज म्हणाले, 'प्रश्न मोठा मार्मिक आहे. पण तुम्ही दिलेला दाखला दृश्यामधील असल्याने तो नामाला तितकासा लागू पडत नाही. एका गृहस्थाला दोन मुली होत्या. दोघींत बरेच अंतर होते. थोरलीचे लग्न झाल्यावर पहिल्या बाळंतपणासाठी ती माहेरी आली. तिला सुंदर मुलगा झाला. एके दिवशी तिची धाकटी बहीण रुसली. रुसण्याचे कारण वडिलांनी विचारले तेव्हा ती म्हणाली, 'तुम्ही ताईला बाळ दिले, मला दिले नाही.' यावर बाप काय म्हणेल?

तसे,

*** नामाच्या अभ्यासाने तुमची आतून वाढ होऊ द्या. तुम्ही आतून वयात या, म्हणजे नामाच्या गोडीचे बोट मला तुमच्या तोंडाला लावता येईल ***

(हृद्य आठवणी)

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती !!!


हृदयात भगवंत दिसू लागल्यावर साधक जेथे जातो तेथे त्याच्या बरोबर तो जातो. देहाच्या व मनाच्या कोणत्याही अवस्थेत साधक एकता असत नाही. त्याची सर्व कर्मे भगवंताच्या नजरेखाली घडतात. अर्थात त्याचे आचार विचार भगवंताला शोभेलसे असतात. उदाहरणार्थ-

स्वामी वादिराज यांचे पुष्कळ शिष्य होते. त्यांपैकी कनकदास मात्र खरा तयार होता. एका एकादशीला स्वामींनी सर्व शिष्यांना एकेक केळे दिले. ते म्हणाले, "आज एकादशी आहे. लोकांसमोर साधकाने खाऊ नये, म्हणून जेथे कोणी पाहणार नाही, तेथे जाऊन केळे खून या." पाचदहा मिनिटात सर्व शिष्य केळे खून परत आले. फक्त कनकदास मात्र केळे तसेच घेऊन परत आला. स्वामींनी विचारले, "का री? तुला कोठे एकांत मिळाला नाही का?'कनकदासाने हात जोडून उत्तर दिले, "नाही महाराज, मी जेथे गेलो, तेथे आपण माझ्या हृदयात बरोबर आलात. मला एकांत मिळाला नाही." शिष्याचे हे शब्द ऐकून स्वामींच्या डोळ्याला पाणी आले!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (नामसमाधी)

देव जसा दयाळू, तसा न्यायीही आहे हे विसरू नये -


श्रीराम. एक पैसे खाणारा माणूस होता. एका प्रकरणात पैसे खाण्याच्या आरोपावरून त्याला निलंबित करण्यात आले. प्रत्यक्ष त्या प्रकरणात त्याने पैसे खाल्ले नव्हते. तो श्रीमहाराजांना भेटला व म्हणाला, 'या प्रकरणात माझ्यावर पैसे खाण्याचा आरोप अगदी खरा नाही. यामध्ये जर मला शिक्षा झाली तर देवाचे घरी न्याय नाही, देवधर्म व रामनाम सर्व थोतांड आहे, असे मी ओरडून लोकांना सांगेन.'

श्रीमहाराज म्हणाले, 'दिवाळी जवळ आली म्हणजे आधी चारपाच दिवस घरात वेगवेगळे फराळाचे जिन्नस करू लागतात. त्यांचा नमुना पाहण्यासाठी आपण ते खातो. त्यावेळी नेहमीचे जेवणही आपण जेवतो. नंतर खुद्द दिवाळी आली म्हणजे फराळाचे यथेच्छ खातो. दिवाळीचे चार दिवस गेल्यावर आपल्याला अजीर्ण होते. मग पाचव्या दिवशी आपण नुसता ताकभात खातो. पण अजीर्णाचा जोर होऊन सहाव्या दिवशी आपल्याला ओकाऱ्या व जुलाब जोरात सुरु होतात. तेव्हा जर आपण लोकांस सांगत सुटलो की, 'अहो, काल मी नुसता ताकभातच खाल्ला आहे तरी मला हा त्रास का होतो आहे कोण जाणे!' आपले म्हणणे बरोबर ठरेल का?

देवाच्या पायावर हात ठेवून तुम्ही सांगा की आपले वर्तन आजपर्यंत अगदी स्वच्छ आहे. मग तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. तसेच करण्यास तुमची तयारी आहे का? तसे नसेल तर देवाला उगीच का दूषण देता?' इतके सांगून श्रीमहाराज त्याला म्हणाले, 'देव दयाळू आहे खास, पण तो तसा न्यायनिष्ठुरदेखील आहे हे विसरू नये!'

~~ हृद्य आठवणी

डोळ्याचे महत्त्व-


श्रीमहाराज सांगत की 'सत्पुरुष त्याच्या डोळ्यांवरून ओळखता येतो. जो अनुसंधानात आहे, त्याची नजर वस्तूंकडे असूनही पूर्ण लक्ष तेथे नसते. जो सिद्ध आहे त्याची नजर लहान मुलासारखी निर्विकार असते. जो मुमुक्षु आहे, त्याची नजर आर्त असते. माणसाला झपाटणाऱ्या कुवासना बहुतांशी डोळ्यांच्या द्वारेच आत शिरतात. माणसाची वृत्ति त्याच्या डोळ्यांवरून कळते. एखाद्याची 'दृष्टी वाईट आहे' असे आपण म्हणतो. देहावसान होताना प्रथम डोळे थिजतात. प्राण गेल्याबरोबर पापण्यांची उघडझाप बंद पडते. डोळ्यांचा उपयोग भगवंताचे दर्शन करण्यासाठी केला तर त्याचे प्रेम लवकर येईल.

*** म्हणून डोळ्यांचा वापर करताना फार दक्षता ठेवावी ***

डोळ्यांना विकार झाला तर तळपायांना काशाच्या वाटीने तेल चोळतात, कानात तेल घालतात; त्यामुळे डोळे शांत होतात. म्हणून दृष्टी चांगली होण्याकरता भगवंताचे नामस्मरण करावे व ते कानांनी ऐकण्याचा अभ्यास ठेवावा. त्यामुळे चित्त एकाग्र होण्यास मदत होईल व दृष्टीही साफ होईल.

(हृद्य आठवणी)

नाम हा सत्कर्मांचा राजा आहे!


पूज्य श्री गुरुदेव रानडे यांना विचारले होते, आपण कोणत्या सामाजिक कार्यात रस घेता? थोडक्यात आपण समाजसेवा कशी करता हा खरा प्रश्न. त्यावर श्री गुरुदेव म्हणाले, "मी नाम घेतो." समाजसेवा वाईट असे नव्हे पण त्यामध्ये प्रत्यक्ष काम करणारे किती व मिरवणारे किती हा प्रश्न आहे. तसेच जे काम करतात ते खरेच निस्वार्थी सेवा करतात की त्यातून लोकांनी आपल्याला मान द्यावा ही अपेक्षा बाळगतात हे ही महत्त्वाचे. लौकिकासाठी सत्कर्म न करावे! मनापासून करणारे व त्यातून अपेक्षा न बाळगणारे फक्त संतच!

भगवंताचे नाम हे सत्-रूप आहे. भगवंत हा सद्गुणांचे निधान आहे. त्याच्या नामाच्या स्मरणाने, अनुसंधानाने किंवा चिंतनाने येणारा विचार हा सद्विचारच असेल. सत् विचारातूनच सत् संकल्प येईल व त्यातूनच सत्कृत्ये घडतील. कारण स्वार्थ, तृष्णा, लोभ यांना मूठमाती मिळेल.

हे समजावून सांगण्यासाठी श्रीमहाराजांनी छान उदाहरण दिले आहे- घड्याळ हे एकात एक गुंतलेल्या चक्रांचे असते. त्यातील प्रत्येक चक्र स्वतंत्रपणे चालू ठेवणे अवघड आहे; पण त्या सर्व चक्रांना गती देणारे मुख्य चक्र चालू ठेवले की आपोआप सर्व लहान चक्रे चालतात किंवा गतिमान होतात. त्याप्रमाणे नामोच्चार हे सत्कार्य घडले की आपल्या हातून घडणारी सर्व कार्ये ही सत्कार्येच असतात. किंबहुना आपल्या हातून सत्कार्ये घडण्याचे टाळता येत नाही. म्हणूनच गुरुदेव म्हणाले, "मी फक्त नाम घेतो!"

~ नामगाथा (डॉ. मधुसूदन बागडे यांच्या पुस्तकातील सारांश)

भक्ताचे भगवंतावरचे प्रेम !!!


श्रीराम. भगवंताचे - सद्गुरूंवरचे प्रेम हे दृश्य नाही. त्याचे निश्चित असे व्यक्त स्वरूप सांगता येत नाही. प्रेम हे कर्म नाही. तो एक अनुभव आहे. जो त्या अनुभवात बुडालेला असतो, तो त्याचे वर्णन शब्दांनी करू शकत नाही. कारण परमप्रेम सिद्ध झाले की ते माणसाच्या ज्ञानेंद्रियांच्या आवाक्यापलीकडे आनंदस्वरूप असते. प्रेमाचा भर ओसरल्यावर भक्त जेव्हा त्या आनंदाचे वर्णन करू लागतो, तेव्हा ते वर्णन म्हणजे त्या आनंदाची केवळ आठवण असते. म्हणूनच तुकोबा म्हणतात, "प्रेम न ये सांगता बोलता दाविता | अनुभव चित्ता चित्त जाणे ||"

आजपर्यंत माझा असलेला "मी" भगवंताला दिल्यानंतरचे प्रेम हे खरे निरुपाधिक प्रेम असते. मग बाकीचे सर्व संबंध गळून पडतात आणि भक्त व भगवंत हा एकच संबंध उरतो. प्रेमस्वरूप अनिर्वचनीय असले, तरी आपल्याला जो आनंद मिळाला तो इतरांना मिळावा किंवा त्याची ओढ लागावी म्हणून; तसेच तो आनंद सांगितल्याशिवाय राहवत नाही म्हणून सत्पुरुष तो शब्दांनी सांगण्याचा प्रयत्न करतात. पण तरी त्याची अवस्था मुक्याप्रमाणे होते. "डूबै सो बोले नहीं, बोलै सो अनजान | गहरौ प्रेम-समुद्र कोउ डूबै चतुर सुजान ||" 
eart emoticon
मौज अशी की जो जीव पूर्वी माया समुद्रात बुडत होता, तो आता मायेच्या पलीकडे जाऊन प्रेम समुद्रात बुडतो. समुद्रातल्या थेंबाला - मिठाला जशी समुद्राची ओढ असते, तशी जीवाला भगवंताची ओढ असते. तो प्रेम समुद्रात शिरला की समुद्रच होऊन जातो. मिर्झा गालिब म्हणतात, "इशरते कतरा दर्यामें समा हो जाना|" समुद्रात मिसळून जाणे हे थेंबाचे ऐश्वर्य आहे!

~ श्रीनारद भक्तिसूत्रे (श्री म वि केळकर - पूज्य बाबा बेलसरे यांच्या भक्तिसूत्राच्या प्रवचनांवर आधारित)

नामाने साक्षीभाव साधणे म्हणजे काय?


श्रीराम. समजा, चोवीस तास जळणारा एक दिवा आहे. त्याची ज्योत सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्री शांतपणे अखंड तेवत राहते. त्याचप्रमाणे नाम सिद्ध झाले म्हणजे साधकाच्या अंतर्यामी ते अनुस्यूतपणे चालू राहते. त्याच्या अंतरी नामाची धारा अखंडपणे आत्मसागरात पडत राहते. त्यामुळे तो साधक आत्मस्वरूपाशी इतका समरस होतो, की स्वतःच्या देहाकडे व जीवनाकडे तो अत्यंत वेगळेपणाने पाहू लागतो. या परकेपणाने पाहण्यास साक्षीभाव असे म्हणतात. ही फारच रम्य अवस्था असते.

अशा अवस्थेमध्ये स्थिर झालेल्या साधकाच्या जीवनात एक विलक्षण गोष्ट आढळते. तो वागताना माणूस म्हणूनच वागतो. पण त्याच्या वागण्यात नित्य आत्मा आणि अनित्य अनात्मा - म्हणजे दृश्याचा पसारा - यांच्यामध्ये एक लय आढळतो. व्यवहाराशी संबंध नसतो, तेव्हा तो अंतर्मुख होऊन आत्मलीन होतो; परंतु जरूर असते तेव्हा तो बहिर्मुख होऊन दैनंदिन कर्मे यथासांग करतो. तो स्वतः कमालीचा समाधानी असल्याने त्याच्या सहवासात माणसे दुःख विसरतात आणि पुनःपुन: सहवास लाभला तर माणूस आत्मस्वरूपाच्या शोधाकडे पूर्णपणे वळतो!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा)

आपला प्रपंच भगवंत चालवतो याची जाण ठेवावी!


श्रीराम. श्रीमहाराजांचे एक उत्तम शिष्य निवृत्ति वयानंतर घरी बसले. निवृत्तिवेतन कमी असल्याने मुलाच्या उत्पन्नातून घरखर्च चाले. श्रीमहाराज त्याला म्हणाले, "दर महिन्यात खर्चाची तोंडमिळवणी होते का? आपण सर्व चालवता हे उत्तर मला नको. प्रत्यक्ष परिस्थिती काय ती सांग." मुलाने सांगितले, "महिन्याचे शेवटचे दहा दिवस जरा जड जातात." त्यावर श्रीमहाराज म्हणाले, "अरे, ही फार चांगली गोष्ट आहे. या दहा दिवसात तरी आपला प्रपंच भगवंत चालवतो याची जाणीव राहते. अशी ओढ राहणे ही भगवंताची कृपाच समजावी."

जगामधील एकंदर पैशाबद्दल श्रीमहाराज म्हणत की, "पृथ्वीवर एक चतुर्थांश जमीन व तीन चतुर्थांश पाणी आहे. पाण्याचे एकंदर प्रमाण कायम राहते. त्याच्यात फरक होत नाही. पृथ्वीवर एकीकडे जेव्हा भरती येते तेव्हा उलट बाजूला ओहोटी असते. तसेच कुबेराकडे एकून धन कायम असते. आपल्याकडे जेव्हा त्याची भरती असते, तेव्हा दुसऱ्या कोणाकडे तरी त्याची ओहोटी असते. आपल्याकडील भरभराट म्हणजे दुसरीकडे कोठेतरी खडखडाट आहे हे निश्चित समजावे. याचा अर्थ दुसऱ्याच्या विपत्तीतून द्रव्यसंचय करून श्रीमंत व्हायचे व त्या संपत्तीचा उपभोग घ्यायचा हे कोणत्याही भगवद्भक्ताला हितावह नाही!

(हृद्य आठवणी)

"दाता तो एक जाणा रघुनंदन" हे विसरता कामा नये!


श्रीराम! आपण दुसऱ्याला द्यावं पण किती द्यावं? विसरता येईल इतकंच द्यावं. आपण खायला घालावं पण त्यामागे हे मी श्रीमहाराजांना आवडतं म्हणून करतो आहे ही पक्की भावना हवी. "दाता तो एक जाणा रघुनंदन" हे विसरता कामा नये. कारण मी केल्याने होईल ही भावना पूर्णपणे गेल्याशिवाय परमार्थ नाही!

~परमपूज्य बाबा बेलसरे