श्रीराम. जगावरील प्रेमात आणि ईश्वरावरील प्रेमात फरक आहे. जगावरील प्रेमात जगाचे वेगळेपण नजरेआड होत नाही. ईश्वरावरील प्रेमामध्ये माणूस ईश्वरपणामध्ये सहभागी होतो. तो ईश्वराचे ईश्वरपण अनुभवतो. त्या अनुभवामध्ये माणसाच्या अंतर्यामी ईश्वराशी अतिशय निकट आणि जिवंत संबंध प्रस्थापित होतो. त्या आंतरिक संबंधातून ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल, त्याच्या खरेपणाबद्दल आणि त्याच्या स्वरूपाबद्दल एक जबरदस्त श्रद्धा उत्पन्न होते. ती श्रद्धा बोधमय असते. त्या श्रद्धेमुळे ईश्वर हाच एक माणसाच्या जीवनाचे आलंबन होतो.
*** माणूस स्वतः आणि स्वतःचे सर्व घेऊन पूर्णपणे ईश्वराचा होऊन जातो. ***
अंतरी ईश्वर स्थिरावून त्याचा अतींद्रिय सहवास लाभल्यामुळे माणसाच्या जीवनातील साऱ्या क्रिया ईश्वराच्या साक्षीपणाने घडतात. मग माणसाला आपले जीवितकार्य कळते. त्याच्या हातून खरे निष्काम कर्म घडते. त्याच्या आयुष्यात भय, चिंता, उदासीनता आणि न्यूनपणाची भावना यांना स्थानच उरत नाही. माणूस बुद्धीने चिंतन करतो तोपर्यंत ईश्वर ही एक मोठी अर्थगर्भ संकल्पना असते. पण प्रतिभा जागी झाली की ईश्वर जणू काय समोरसमोर येतो. प्रतिभेच्या सामर्थ्याने संकल्पनेत वास करणारा ईश्वर स्वतःमध्ये स्वतः इतकाच जिवंतपणे प्रगट होतो. "मी" आपलेपणाच्या प्रेमरज्जूने ईश्वराशी नित्ययुक्त होतो. तो परममूल्य बनून सबंध जीवन व्यापून टाकतो आणि आतमध्ये ईश्वराचे अनुसंधान आणि बाहेर जगाशी पूर्ण संवाद असे मंगलमय जीवन माणूस जगतो!
~ परमपूज्य बाबा बेलसरे (ईश्वर-स्वरूप आणि साक्षात्कार)
No comments:
Post a Comment