श्रीराम. व्यवहार सांभाळून साधना करणाऱ्या साधकाला बहुरूप्याप्रमाणे अनेक भूमिका कराव्या लागतात. त्या करताना शरीराची व मनाची शक्ती खर्च करावी आगते. मग नामासाठी शक्ती कमी पडते. ही गोष्ट माझ्या ध्यानात आल्या बरोबर जरुरीपेक्षा अधिक होणारा शक्तीचा खर्च मी लगेच बंद केला.
१) शरीर निरोगी ठेवण्यास आवश्यक तेवढेच खाणेपिणे ठेवले
२) बोलण्याने आपली पुष्कळ शक्ती खर्च होते. आधीच व्यवसायामुळे माझे बोलणे अधिक. त्यामुळे मी मौनाचा अभ्यास केला. रोज मी दोन तास तरी मौन पाळतो. नामावाचून मनात काही नसणे हे खरे मौन. इतके साधले नाही तरी ज्या दिवशी मौन होत नाही त्या दिवशी नामाची तंद्री तीव्रपणे लागत नाही असा अनुभव येतो.
३) गजबजलेल्या शहरांतून डोळे व कान या इंद्रियांना अति काम पडते. ते कमी करण्यास रोज दोन तास तरी मी कानात कापसाचे बोळे घालतो व डोळे मिटून स्वस्थ जप करीत बसतो.
४) कामवासनेत वाईट अपवित्र असे काही नसले, तरी वय, परिस्थिती आणि साधना यांना अनुसरून मी या भोगला बंधन घातले. केवळ नामानेच या शक्तीला भगवंताकडे वळवता येते असा माझा अनुभव आहे.
५) व्यवसायाला अवश्य तेवढेच वाचन व लेखन मी करतो. रोज वर्तमानपत्रातल्या ठळक वार्ताच फक्त पाहतो.
६) लोकांच्या घरगुती भानगडीची चौकशी करून त्यावर काथ्याकूट करणे अजिबात बंद केले. गमतीने झाले तरी त्यामध्ये दोषदृष्टी नसते.
७) काळजीची वृत्ती उगम पावली की लगेच तिचा गळा दाबून तिला कासावीस करण्याचा अभ्यास मी सतत केला.
८) जो सद्गुरूला शरण जातो, त्याच्या देहावर त्याची सत्ता चालते. अर्थात ते प्रारब्ध टाळीत नाहीत पण मागेपुढे करून सोयीने भोगायला लावतात हे पक्के लक्षात ठेवून मान, पैसा, घरदार आणि देहाचे आजारपण यावर विचार करून होणारा शक्तीचा व्यय थांबवण्यात मला चांगले यश आले.
No comments:
Post a Comment