Translate

Thursday, June 18, 2015

अखंड अनुसंधानात मौनाचे महत्त्व --


श्रीराम. अंतर्मुख झाल्यावाचून भगवंताचे अनुसंधान साधत नाही. वृत्तीची बाहेर धावण्याची सवय सुटल्याशिवाय अंतर्मुख होता येत नाही. वाणीच्या द्वारा वृत्ती जोराने बाहेर धावते, म्हणून बोलणे थांबवले तर वृत्तीचा बहिर्मुखपणा आपोआप क्षीण होतो. तोंडाने बोलणे बंद करणे म्हणजे मौन पाळणे असा सामान्य समाज आहे. पण ते खरे मौन नव्हे. भगवंताच्या चिंतनामध्ये पूर्णपणे गुंतल्याने बोलण्याचे भान न उरणे हे खरे मौन होय.

ज्या प्रक्रियेने जीव परावाणीपासून घसरला आणि वैखरीपर्यंत पोचला त्याच्या उलट प्रक्रियेने वैखरीपासून परत परावाणीपर्यंत पोचवण्याचे कार्य मौन करते. म्हणून मौन हा अनुसंधानाचा मोठा आधार आहे. नामाचा अभ्यास वैखरीपासून परेपर्यंतचा आहे. वैखरीने नाम प्रारंभ केल्यावर फालतू बोलणे आपोआप कमी होते. हे नाम स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत हळू हळू अभ्यासाने पोहोचते. अखेर सद्गुरू कृपेने पश्यन्तीतल्या नामाचा लय परेमध्ये होतो.

परेचा पूर्ण उदय झाला की भगवंताच्या अस्तित्वाचे केवळ भान उरते. अनाहत नादाने अंतर्याम भरून जाते. शुद्ध चेतनेच्या या नादास ब्रह्मनाद म्हणतात.

या प्रवासात मौनाचे फार महत्त्व आहे. तोंडाने मौन पाळणे चांगले, बोलावे असे न वाटणे अधिक चांगले, बोलण्याची ऊर्मी न येणे उत्तम तर बोलण्याची वृत्ती लोपणे सर्वोत्तम होय! निर्विचार, निर्विकल्प आणि निःशब्द होण्यास मौनासारखा रामबाण उपाय नाही. म्हणून मौन साधले की शरीर व मन अनुसंधानास पात्र होतात!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (अंतर्यात्रा- सारांश)

1 comment:

  1. श्रीराम जय राम जय जय राम

    ReplyDelete