Translate

Tuesday, January 3, 2017

आज परमपूज्य बाबांचं १९ वं पुण्यस्मरण

परमपूज्य बाबांच्या पुण्य स्मृतीस विनम्र अभिवादन.


|| श्रीराम समर्थ ||

तनू जयांची कृश ओजस्वी
वदनी निर्मळ हास्य वसे।
मधुर भाषणें जनां मनाला
नित्य दिलासा लाभतसे॥

नयनां मधुनी स्नेह कृपेचा

अविरत हो वर्षाव खरा।
सदा सांगती तळमळुनी ते
श्रीरामाचे नाम स्मरा॥


तत्वज्ञान श्री महाराजांचे
साऱ्या जगता बोधियले।
आचरुनी ते स्वये जीवनीं
लोकां नामी लावियले ||


गुरु आज्ञा ही प्रमाण होती
सदा जीवनीं सर्व परी।
सुखदुःखाच्या वाटे वरती
महाराजांची साथ खरी॥


गुरुरायांचा आठव त्यांच्या 
कंठी गहिवर सहज भरे।
ओलावा नयनात दाटता
रोम रोम पुलकीत खरे॥


असे आमुचे बाबा त्यांच्या 
नित नत मस्तक चरणीं हे।
किती सांगती चला लावुया
मन नामाच्या स्मरणीं हे॥


|| जानकी जीवन स्मरण जयजयराम ||


~ स्वानंद ~

श्रीराम 

जये श्रीवचा 
             मानली वेदवाणी |
सदा स्वस्थ जे 
           जीवनीं रामनामीं  ||
किती बोधिती
        तळमळीने जिवाला |
नमस्कार त्या 
        पूज्य श्री केशवाला ||

श्रीराम

स्मरे नाम जो सर्वदा
                प्रीय ज्यांना ।
जया भेटता स्वस्थ 
               वाटे जीवांना ॥
निरोपास श्रीं च्या 
            जनां पोचवीला ।
नमस्कार त्या पूज्य
                श्री केशवाला ॥

               


           ..... स्वानन्द. 



Monday, January 2, 2017

संगत कुणाची करावी?



श्रीराम. ज्यांनी आपले जीवन नामाला वाहिलेले आहे अशांची संगत करावी. अशा व्यक्तीला नुसते जवळून पाहिल्याने व त्यास स्पर्श केल्याने आपली नाम घेण्याची प्रेरणा जोराने उमटते.

नामाचा आपला अभ्यास एका इयत्तेपर्यंत पोचल्यानंतरच नामात मग्न झालेल्या माणसाची व त्याच्या सहवासाची किंमत कळते!

नाममध्ये रमल्यामुळे ज्याला सद्गुरू सान्निध्याचे वरदान मिळाले त्याला मौज भोगण्यासाठी दसरा अन् दिवाळीची वाट पाहण्याची जरूर नाही!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे ~~ 

संन्यास आणि योग



श्रीराम. भगवी वस्त्रे घालणे म्हणजे संन्यास नव्हे. संन्यास म्हणजे सोडणं आणि हे सोडणं वृत्तीचं आहे. जे भगवंताच्या आड येतं ते निश्चयानं सोडणं याचं नाव संन्यास!

संन्यास आणि योग यामध्ये फरक नाही. योग म्हणजे जोडणं. ज्याचा जीव भगवंताशी कायमचा जोडला गेला तो योगी! आणि वृत्तीच्या संन्यासाशिवाय असा योग संभवत नाही!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे ~~

ईश्वर दर्शन म्हणजे काय?



ईश्वरदर्शन म्हणजे काय?

१) ईश्वरी शक्तीने माणसाच्या जीवनाचा ताबा घेणे
२) माणसाच्या अंगी मुरलेला कर्तेपणाचा अभिमान शून्य अंशावर घसरणे
३) आपण ईश्वराच्या हातातील बाहुले आहोत अशी बालंबाल खात्री होणे
४) ईश्वर ठेवील तसे त्याच्या स्मरणात राहणे

*मन पूर्ण शांत होणे किंवा समाधान पावणे हा ईश्वरदर्शनाचा अथवा साक्षात्काराचा खरा अर्थ आहे.* या समाधानाला आत्मशांती अथवा स्वरूपशांती म्हणतात!

परमपूज्य बाबा बेलसरे (ईश्वर - स्वरूप आणि साक्षात्कार)

भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी .....



श्रीराम. भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने, निर्व्याजपणे आणि उत्कटपणे त्याचे चिंतन करणे हा राजमार्ग आहे. मुखमध्ये नाम ठेवल्याने त्याचे चिंतन सुलभ होते.
हे करत असताना प्रापंचिक वासनातृप्तीचे पोषण करणाऱ्या सूचना आपण आपल्या मनाला देऊ नयेत. त्यामुळे वासनांचे कवच घट्ट होते.
अनुसंधानाने आपल्या मनोरचनेत भगवंताला अनुकूल अशी पुनर्रचना घडून येते. त्यास विरोधी वर्तन करू नये.
🌹🌹परमपूज्य बाबा बेलसरे (भगवंताचे अनुसंधान: साधनेचा प्राण)🌹🌹

Tuesday, September 6, 2016

अजपाजप


श्रीराम. अजपाजप हा श्वासासारखा न लक्ष देता चालणारा सहज जप आहे. जप होतोय ही सुद्धा जाणीव नाही. इतकं नाम घेतलं पाहिजे की तो सहज स्वभाव झाला पाहिजे. पिंडच नाम बनला पाहिजे. इतकं नाम घ्यायला मात्र पाहिजे. त्याकरता मुख्य पथ्य काय? तर प्रपंचात जे घडतं त्याचा बिनतक्रार स्वीकार व्हायला हवा. मनातही 'हे असं का' हे न येणं हे त्यातलं मर्म आहे!

🌞परमपूज्य बाबा बेलसरे (सत्संग)🌞

मी तुला योग्य नाही!



श्रीराम. तुकाराम बुवा म्हणतात, मी तुला योग्य नाहीच आहे! याति हीन मति हीन कर्म हीन माझे। सांडोनिया सर्व लज्जा शरण आलो तुज।। येई गा तू मायबापा पंढरीच्या राया। तुजवीण शीण वाटे क्षीण झाली काया।।...अशी भावना कळकळीने आली पाहिजे. असा विचार करावा की जगात लाखो माणसं आहेत, त्यात मी माझेपण मिरवतो, ही भावना आली पाहिजे, आत कळवळलं पाहिजे की मी हीन, तुझ्याशिवाय मला कोणी नाही!

(पू बाबा सांगत आहेत), माझा पहिला मुलगा गेला, देह समोर पडला होता. सौ आईंना भेटायला श्रीमहाराज आले व म्हणाले, "आता दुःख पुरे." सौ आई म्हणाल्या, "माझी आतडी पिळवटतात". यावर महाराज मला म्हणाले, "भगवंत मला जवळ करत नाही म्हणून आतडी पिळवटली तर ते अंतःकरण शुद्धच होईल!" श्रीमहाराजांनी किती गोड सांगितलं! हा जवळचा मार्ग आहे. पगदंडी आहे, पाऊलवाट आहे. श्रीमहाराजांच्या समोर रडावं पण होतं असं की आपल्याला मी चुकलो, मी पाप केलं ही जाणीवच नाही. तुला आवडत नाही असं वागलोच नाही अशी खात्री पाहिजे आणि नामावर श्रद्धा पाहिजे!

🍁परमपूज्य बाबा बेलसरे (सत्संग)🌿

साधक कसा असावा?

|| श्रीराम समर्थ ||


Monday, May 16, 2016

भक्तीतला निरोध!


श्रीराम. योगातील चित्त वृत्तींचा निरोध बऱ्याच झटापटीनंतर साधतो. भक्तीत मात्र हा निरोध सहज असतो! धरणामध्ये त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी अडवले तर धरणाची भिंत पडण्याचा धोका असतो. पण त्याच पाण्याला दुसरीकडे वाट काढून दिली तर तो धोका टळतो. तसा मनाचा प्रवाह भगवंताकडे वळवला तर कोणताही धोका न होता निरोध साधतो.
म्हणून सातव्या नारद भक्तिसूत्रात म्हटले आहे- सा न कामयमाना निरोधरूपत्वात्।- जेव्हा असा सहज निरोध भक्तिमुळे साधतो, तेव्हा विषयवासनांना आपोआप अटकाव बसतो. पराभक्ति वासनांना पोषक असूच शकत नाही! वासना आहे पण वासना जे तन्निष्ठ! महाराज म्हणायचे, पूर्वेकडे तोंड करून बसलेल्याला पश्चिमेकडे पाठ कर म्हणून सांगावं का लागतं? तसं परमभक्ति ज्याच्या हृदयात उत्पन्न झाली त्याला विषय सोड म्हणून सांगावं लागत नाही!

भक्त कुणाला म्हणावे?



भक्त म्हणजे -


१) भगवंताला वाहिलेली, 

२) भगवंताच्या अनुसंधानात मुरलेली, 
३) भगवंताच्या स्मरणात धुंद झालेली, 
४) भगवंताने व्यापलेली, 
५) वासना मेलेली, 
६) अहंकार व कर्तेपण जळलेली व 
७) भूतमात्रांशी विनम्र झालेली व्यक्ती होय .

~ परमपूज्य बाबा बेलसरे (भगवंताचे अनुसंधान- साधनेचा प्राण)

Wednesday, May 4, 2016

नवीन पुस्तके

श्रीराम. खालील पुस्तकांसाठी श्री अविनाश भाटे यांच्याशी संपर्क साधावा-- फोन नंबर खालील फोटोमध्ये दिलेला आहे. साधकांसाठी अतिशय मार्गदर्शक अशी पुस्तके आहेत.

Monday, February 8, 2016

आज परमपूज्य बाबांची जयंती!

🌺🌺🌺

 !!! नामप्रभात !!!
🌺🌺🌺

श्रीराम. ८ फेब्रूवारी १९०९. या पावन दिवशी जन्म झाला एका अध्यात्मसूर्याचा! परमपूज्य बाबा बेलसरे यांचा. आज त्यांची १०७ वी जयंती. स्वतःचे आयुष्य संपूर्णपणे सद्गुरूंच्या चरणी वाहिल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या नामसाधनेत निरंतर राहून कित्येक लोकांच्या आध्यात्मिक आयुष्याची पहाट करणारे पूज्य बाबा! आज त्यांच्या ‘आनंद-साधनेतील’ नामाबद्दलच्या प्रत्येक साधकाने हृदयाशी घट्ट जपाव्या अशा ओळी-

“भगवंताचे नाम ही ‘दिव्य संजीवनी’ आहे. जो तिचे सेवन करील, त्याच्या जीवनात आतबाहेर स्वस्थता निर्माण करण्याची जबाबदारी भगवंतावर आहे हे साधकाने विसरू नये.”

🌺🌺🌺
!!! श्रीराम समर्थ !!!
🌺🌺🌺

Sunday, October 4, 2015

ज्ञानेश्वरी अध्याय २- ओवी क्रमांक ५९-

ज्ञानेश्वरी अध्याय २- ओवी क्रमांक ५९-

तू गुरु बंधू पिता | तू आमुची इष्ट देवता |
तूचि सदा रक्षिता | आपदी आमुतें || ५९ ||

~ श्रीराम. (अर्जुन आपला सखा कृष्ण याला माझे हित काय आहे ते आता तूच सांग अशी विनवणी करतो, तेव्हा त्या सख्यत्वाच्या आधारावरची पुढील ओवी आणि त्यावरील पूज्य बाबांच्या विवरणाचा सारांश).

या ओवीतलं एकेक पद बघा. पहिल्यांदा अर्जुन कृष्णाला गुरु म्हणतो. गुरु म्हणजे तो ज्ञानी आहे, श्रेष्ठ आहे. म्हणजे जे शिकावयाचे ते तुझ्यापासूनच शिकावयाचे! हा देवाशी अथवा सत्पुरुषाशी संबंध आहे. नंतर बंधू- बंधू याचा अर्थ असा आहे की, मी खाली जात असताना मला वर नेणारा. दुसरा अर्थ श्रीमहाराजांनी सांगितला की, गुरुबंधू म्हणजे गुरूला काय आवडते ते सांगणारा! नेहमी असे असते की, जे ज्येष्ठ श्रेष्ठ असतात ते आपल्या गुरुचं अंतःकरण लवकर ओळखतात. आणि त्यांना काय आवडते ते सांगू शकतात. ते आपल्याला गुरूंशी कसं वागावं हे शिकवतात. जे ज्ञान देतात ते गुरुबंधू. पिता चा अर्थ आहे- रक्षणकर्ता!

यामध्ये ‘तू आमुची इष्ट देवता’ हे फार महत्त्वाचे आहे. एकच देव! आपल्याला ते चमत्कारिक वाटते, पण भक्तीमध्ये प्रेमाची अतिशय एकाग्रता होण्याला हे आवश्यक आहे. तुलसीदासांची एक गोष्ट आहे. हे रामभक्त. त्यांना कुणी सांगितले की श्रीकृष्ण हा पूर्णावतार आणि त्याला १६ कला होत्या. राम हा मर्यादापुरुषोत्तम आणि त्याला ९ कला होत्या. तर त्या गृहस्थाचे म्हणणे असे की १६ कला असलेल्या श्रीकृष्णाची तुलसीदासांनी भक्ती करावी. तुलसीदास त्यावर म्हणाले, “मला रामामध्ये ९ कला आहेत हे माहीत देखील नव्हते. तेव्हा आता तू सांगितलेस तर माझी रामभक्ती ९ पट वाढेल! भक्ताच्या जीवनात अशी एक अवस्था येते, की त्याला दुसरा देव नाही!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड २ रा)

Saturday, October 3, 2015

हेचि देवाचे दर्शन| चित्ती राहे समाधान ||

||श्रीराम समर्थ||


ज्ञानेश्वरी विचारधारा ४-

नाम घेत आहोत म्हणजेच योग्य मार्गावर आहोत!

श्रीराम.
~~ एक माणूस गिरणीच्या यंत्रशाळेत गेला. तिथे त्याचे उपरणे एका चाकात अडकले, तर हा हा म्हणता तो सर्वच त्यात ओढला गेला. तसे माणूस भगवंताचे नाम घेऊ लागल्यावर तो पोहोचतोच यात शंका नाही. त्याची जी खेच आहे, त्याला अभिक्रम म्हणतात.

~~ भगवंताचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही.

~~ आपली आतली घाण जेवढी असते ती नाहीशी करण्यास लागणारा प्रयत्न आपला होत नाही, म्हणून आपली प्रगती दिसत नाही.

~~ महाराज एकदा म्हणाले, "गाईने शेण टाकले की ते थोडीतरी माती घेतल्याशिवाय उठणार नाही. तसे तुम्ही थोडी जरी भक्ती केलीत तर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तो परिणाम सूक्ष्मातला असल्याने कळणार नाही.

~~ प्रगती होत आहे की नाही हे लोकांनी सांगण्यापेक्षा आपल्याला आपल्या मनानेच सांगितले पाहिजे की मी योग्य मार्गावर आहे.

~~ कबीराचे वाक्य नेहमी लक्षात ठेवावे- "कहत कबीरा सुन मेरे गुणिया | साहेब मिले सबुरी में ||" याला अरविंदांचे वाक्य फार सुंदर आहे, "You must have intense aspiration but with great patience." या पेशन्स चा अर्थ असा की मला मनाची शांतता पाहिजे यात शंका नाही पण ती तुझ्या इच्छेप्रमाणे, तुला हवे तेव्हा मला दे. नाम घेतले की थोडक्या काळात साधू होईल असे कठीण आहे!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड २ रा)

ज्ञानेश्वरी विचारधारा ३-

नामस्मरणाच्या अभ्यासाला तळमळ आवश्यक;
तत्त्वज्ञानाचा उपयोग साधनेसाठी!

परमपूज्य बाबा बेलसरेंच्या ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या खंडाच्या प्रस्तावनेतील काही भागाचा सारांश -

ती. बाबा एकदा अगदी सहज बोलताना म्हणाले, "अरे, सामान्य माणूस आपली डिग्री मिळवण्यासाठीसुद्धा पद्धतशीर प्रयत्न करीत नाही; अभ्यासाची पद्धत किती जणांना माहीत असते? नामस्मरण हा एक जन्मभर चालणारा अभ्यास आहे याची जाणीव किती लोकांना असते? मग अर्धवटपणे केलेल्या नामस्मरणाने काय साध्य होईल?" अशा त्यांच्या काही सूचना वाचकांना कदाचित आवडणार नाहीत, कारण सत्य हे कटू असते आणि ते श्रोत्यांना ऐकायला आवडत नाही. पण, जे अप्रिय आहे, परंतु पथ्यकारक आहे, ते सांगणारा व ऐकणारा भेटणे दुर्लभ असते!

ज्ञानेश्वरीच्या दुसरा अध्याय आणि त्यावरचे ती. बाबांचे विवेचन याचा अभ्यास झाल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ती. बाबांना या सर्व विवेचनातून वाचकांना असे सांगावयाचे आहे की, या तत्त्वज्ञानाचा उपयोग केवळ आपल्या बुद्धीचे समाधान होण्यासाठी नसून त्याचा उपयोग आपले साधन अधिक दृढ व्हावे यासाठी केला पाहिजे. आपले साधन अधिक सातत्याने, चिकाटीने व नीट समजून केले तर ते अधिक फलदायी होईल. ती बाबा म्हणत, साधन हा एक अभ्यास आहे आणि तो जन्मभर चालणारा आहे.

माणूस पदवी मिळवण्यासाठी, नंतर व्यवसायात यश, पैसा ऐश्वर्य मिळावे म्हणून, समाजात मानमान्यता मिळावी म्हणून अभ्यास करतोच. याला Management of Objective असे म्हणतात. परमार्थाची साधना ही अशी नाही. ती कर्मयोगासारखी जास्त आहे.

***"हा अभ्यास सतत त्याच तीव्रतेने चालणे हेच त्याचे फळ आहे"***

महाराज म्हणत असत की, नामाने काय साधावे तर नामच साधावे!

ज्ञानेश्वरी विचारधारा २-

श्रीराम. आज तीन गोष्टी सांगतो तुम्हाला. या अगदी अनुभवाच्या आहेत. या गोष्टी झाल्या तर आपले भाग्य उदयाला आले असे समजावे!

१) हे अध्यात्म शास्त्र असे आहे, की ते एखाद्या व्यक्तीच्या तर्फेच रात्रंदिवस कानी पडावे; तरच हे साधते.

२) दुसरी गोष्ट अशी की स्वाभाविकच अनासक्त वृत्ती असावी. पैशाचे प्रेम फार नसावे, देहाचे प्रेम फार नसावे ही पुण्यायीचीच गोष्ट आहे.

३) आणि तिसरी गोष्ट ही की भगवंताचे स्मरण मला असावे ही स्वाभाविक तळमळ असावी.
या तीन पुण्यायीच्या गोष्टी आहेत. त्या जर अंगी आल्या तर पुण्य उदयाला आले असे समजावे!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड १ ला)