श्रीराम. प्रपंच हा कारखान्यासारखा आहे. तेथे मोडलेल्या वस्तू दुरुस्त करायला आपल्याला शिकायचे आहे. मग तक्रार करून कसे चालेल? म्हणून प्रारब्धाने जो बरा वाईट प्रपंच आला आहे त्यात समाधान मानून आपण आपले लक्ष भगवंताकडे लावावे. परिस्थिती पूर्ण सुधारल्यावर नाम घेऊ म्हणेल तो फसेल.
महाराजांची जीवनाकडे पहाण्याची ही दृष्टी असल्याने नेहमी तक्रार करणारा किंवा रड्या मनुष्य त्यांना आवडत नसे.
'प्रपंच टाळणे अशक्य असते. तुम्ही हसत करा किंवा रडत करा, तो करावा लागतोच ना? मग तो भगवंताच्या स्मरणात हसतखेळत का करू नये? प्रपंचाला भगवंताकडे वळवा म्हणजे त्याचे दुःख नाहीसे होते.' हा श्रीमहाराजांच्या शिकवणुकीचा मूळ मुद्दा आहे.
माणसाचे बहिरंग म्हणजे त्याचा प्रपंच, तो पुष्कळ सुधारत बसण्यापेक्षा त्याचे अंतरंग, म्हणजे त्याची वृत्ति सुधारली तर सर्व समाज आपोआपच अधिक सुखी व समाधानी बनेल हे श्रीमहाराजांस लोकांस पटवून द्यावयाचे होते. वृत्ति सुधारण्यास भगवंताची भक्ति हाच एक सर्वसुलभ उपाय असल्याने सर्वांनी भगवंताचे नाम घ्यावे असा अट्टाहास त्यांनी जन्मभर धरला! (के. वि. बेलसरे - श्रीमहाराज चरित्र)
No comments:
Post a Comment