Translate

Wednesday, December 31, 2014

आरोग्यपूर्ण अध्यात्मिक साधनेसाठी पूज्य बाबांनी सांगितलेले आरोग्यवर्धक कषाय !!

परमपूज्य बाबा बेलसरे हे अतिशय शिस्तबद्ध आयुष्य जगणारे होते. साधकाने स्वतःच्या तब्येतीची काळजी नीट घेतली तरच त्याला मनासारखे साधन करणे शक्य होईल याबद्दल त्यांचा कटाक्ष होता. अनेक प्रवचनांतून आपण सर्वांनी ते योग्य आहारावर किती भर देत हे पाहिलेच आहे. त्याच एका प्रवचनात ते या आरोग्यवृद्धी करणाऱ्या कषाय पेयाबद्दल माहिती देतात. हे कषाय अत्यंत गुणकारी असून पचनशक्ती, भूक, निद्रा, उत्साह वर्धन अशा अनेक बाबतीत उपयोगी आहे. सत्पुरुषाने सांगितलेल्या या पेयाचा आपणा सर्वांना फायदा मिळावा आणि निरोगी अध्यात्मिक जीवन जगण्यासाठी त्याचा आपण उपयोग करून घ्यावा यासाठी इथे देत आहे – (A “Kashaya” recipe given by Poojya Baba Belsare that helps improve one’s health and aids in betterment of Paramarthik sadhana.)
कषाय साधन व कृती (Ingredients and Recipe of Kashaya)
1) धणे १०० ग्रॅम (Coriander seeds – 100 gram)
2) बडीशेप ५० ग्रॅम (Saunf / fennel seeds – 50 gram)
3) जिरे २५ ग्रॅम (Cumin seeds – 25 gram)
4) बाळंतशेपा ५० ग्रॅम (Dill seeds – 50 gram)
5) गोखरू २५ ग्रॅम (Small caltrops – 25 gram)
6) वावडिंग २५ ग्रॅम (Embelia ribes or false black pepper – 25 gram)
7) मेथी १० ग्रॅम (Fenugreek seeds – 25 gram)
8) सुंठ १० ग्रॅम (दमा असल्यास) (Dry ginger powder – 10 gram, if one has asthma or bronchitis problem)
9) ज्येष्ठमध २० ग्रॅम (खोकला असल्यास) (Mulethi / Liquorice – 20 gram if one has frequent cough)
हे सर्व पदार्थ एकत्र करून थोडेसे लालसर रंगावर भाजावेत. गार झाल्यावर मिक्सर मधून काढावेत. कषाय तयार करताना चहा सारखेच करायचे आहे. 3/४ कप पाण्यात १/२ किंवा १ चमचा साखर आणि १ चमचा ही पावडर घालून उकळी आणणे. उकळी आल्यावर गाळून थोडेसे दूध घालणे.
Mix all the ingredients and roast till they become slightly reddish brown. Let it cool. Grind them together. Preparing kashaya is very similar to tea making. Add ¾ cup of water, ½ to 1 spoonful of sugar and 1 spoon of Kashaya powder. Let it boil. Strain it and add little milk

Tuesday, December 9, 2014

सद्गुरू आज्ञा पालन हा अभ्यास! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

आपल्या सद्गुरूंनी सांगितलेली आज्ञा पालन करणं हा अभ्यास आहे. सद्गुरू जे सांगतील ते मला योग्यच सांगतील. तिथे आपली अक्कल चालवायची नाही. त्यांनी जर सांगितलं स्वस्थ बैस, तर हाच अभ्यास आहे. ते जे सांगतील ते! त्याचं कारण असं आहे, की माझं जे कर्म आहे ते संपण्याकरता त्यांच्या आज्ञेचं पालन करणं जरूर आहे. मला याचा अत्यंत फायदा झाला. मला असं पाहिजे, तसं पाहिजे हे माणसाच्या मनातून जाता जात नाही. ते जर जायला हवं असेल तर तुम्ही सांगा मी काय करू ते. एकदा महाराजांना मी असा प्रश्न केला, " समजा, मी आईबापाचं ऐकतो आहे. आईबाप साधी माणसं आहेत. त्यांचा हेतू चांगला पण सध्याची परिस्थिती माहीत नाही. त्यांचं ऐकताना माझं व्यवहारात नुकसान झालं तर?" यावर महाराज म्हणाले, "जिथे हेतू शुद्ध आहे, तिथून जे येतं ते प्रारब्धाला अनुकूलच येतं; त्याच्या उलट होणारच नाही"

अजून एक गोष्ट अशी की कुणाचं तरी ऐकलं पाहिजे ना! माझं म्हणणं असं की या ऐकण्यामध्ये आपल्या बुद्धीला वळण लागतं. तिचा उच्छृंखलपणा कमी होतो. सद्गुरूंचा हेतू काय असतो, तर तुमची कर्मामधील जी आसक्ती असते ती कमी करणं हे त्यांचं काम आहे. क्षुद्र गोष्ट असते पण त्यामागे जी उर्मी असते ती आणि तिचा जोर कमी करणं हा हेतू असतो.

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ८ मधून) 

Monday, December 8, 2014

ज्ञानेश्वरीचा आठवा खंड आता उपलब्ध!

श्रीराम समर्थ! 

पूज्य बाबांचा ज्ञानेश्वरी वरील आठवा खंड कालपासून गोंदवल्यात उपलब्ध झाला आहे. आधीचे सात खंड आहेतच. त्याबरोबर अजून काही खालील पुस्तके जी मध्यंतरी उपलब्ध नव्हती ती देखील आता मिळतील. उत्सवास जात असलेल्यांनी अवश्य लाभ घ्यावा!





Thursday, December 4, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन १४ -

||श्रीराम समर्थ|| 

नाम --

१४) नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगाला सुद्धा विसरेल. काही काळ तो त्या अवस्थेत राहील. त्यातून थोडा खाली आला तर त्याची दृष्टी निराळी असेल. पण नाम पचले की मग तो साध्या माणसासारखाच दिसेल.

~~ श्रीराम. श्रीमहाराज अनेक ठिकाणी सांगतात की नाम व परमात्मा एकच आहेत. आणि जिथे परमात्मा आहे तिथे आनंद असणारच. किंबहुना परमात्मा आनंदरूपच आहे. मनुष्याची काळजी, चिंता, दुःख ही सर्व कालाधीन आहेत. आपल्याला काल घडून गेलेले वज्रलेपासारखे हृदयात कोरले जाते म्हणून ताप, उद्या काय होणार याची चिंता जळते म्हणून व्यग्रता आहे. तेव्हा हा काळ थोडा वेळ का होईना मनुष्य विसरला तर काळजी चिंता दुःख राहणारच नाही असे महाराजांचे कळकळीचे सांगणे आहे. “आलाच आहात तर तुमच्या काळजीचे गाठोडे रामाच्या पायापाशी ठेवून जा ना!” असे महाराज गोंदवल्यास आलेल्या प्रत्येकास सांगत. किती खोल अर्थ आहे त्यामध्ये!

नामात रममाण होणे ही आयुष्याची इतिकर्तव्यता व्हावी असे पूज्य बाबा बेलसरे सतत सांगताना आढळतात. अशा या नामात आहे काय? तर स्वतःला आणि स्व-केंद्रित सर्व गोष्टींना फाटा देण्याचे सामर्थ्य ह्यात आहे. नामाचे प्रेम येणे ही थोडीथोडकी गोष्ट नाही. आत्यंतिक गुरुकृपा आणि तळमळीने केलेले नाम-साधन ह्यातच फक्त नामाचे प्रेम आपणास बहाल करण्याचे सामर्थ्य आहे. स्व गेला की जग गेलेच! कारण आपले जग हे स्वतःभोवतीच गुरफटलेले असते. नामाच्या संगतीत हा विसर पडला तर मनुष्याचे जीवन किती आनंदमय होईल! अविरत प्रयत्न आणि सद्गुरूंची प्रार्थना यानेच हे शक्य होऊन मनुष्य तो आनंद भोगेल. असा हा आनंद भोगलेला मनुष्य साहजिकच चारचौघांच्या सारखा दृश्यात रमणार नाही. त्याच्यात आंतरिक बदल होईल. किंबहुना हा आंतरिक बदल हेच साधनेचे मर्म आहे.


एकदा का अशी गोडी लागली की माणूस त्यात रमूनच जातो. पण याचा अर्थ तो वास्तवाच्या पलीकडे जातो असे नाही. सुरुवातीचा काल कदाचित तो थोडा वेगळा भासेल पण एकदा का नामाची सवय अंगी दृढ झाली की तो सर्व सामान्य मनुष्याप्रमाणेच राहील. सगळ्यात भाग घेईल; परंतु त्याचे मन मात्र नेहमी भगवंताच्या – सद्गुरूंच्या प्रेमाने ओथंबलेले राहील!