Translate

Tuesday, September 6, 2016

अजपाजप


श्रीराम. अजपाजप हा श्वासासारखा न लक्ष देता चालणारा सहज जप आहे. जप होतोय ही सुद्धा जाणीव नाही. इतकं नाम घेतलं पाहिजे की तो सहज स्वभाव झाला पाहिजे. पिंडच नाम बनला पाहिजे. इतकं नाम घ्यायला मात्र पाहिजे. त्याकरता मुख्य पथ्य काय? तर प्रपंचात जे घडतं त्याचा बिनतक्रार स्वीकार व्हायला हवा. मनातही 'हे असं का' हे न येणं हे त्यातलं मर्म आहे!

🌞परमपूज्य बाबा बेलसरे (सत्संग)🌞

मी तुला योग्य नाही!



श्रीराम. तुकाराम बुवा म्हणतात, मी तुला योग्य नाहीच आहे! याति हीन मति हीन कर्म हीन माझे। सांडोनिया सर्व लज्जा शरण आलो तुज।। येई गा तू मायबापा पंढरीच्या राया। तुजवीण शीण वाटे क्षीण झाली काया।।...अशी भावना कळकळीने आली पाहिजे. असा विचार करावा की जगात लाखो माणसं आहेत, त्यात मी माझेपण मिरवतो, ही भावना आली पाहिजे, आत कळवळलं पाहिजे की मी हीन, तुझ्याशिवाय मला कोणी नाही!

(पू बाबा सांगत आहेत), माझा पहिला मुलगा गेला, देह समोर पडला होता. सौ आईंना भेटायला श्रीमहाराज आले व म्हणाले, "आता दुःख पुरे." सौ आई म्हणाल्या, "माझी आतडी पिळवटतात". यावर महाराज मला म्हणाले, "भगवंत मला जवळ करत नाही म्हणून आतडी पिळवटली तर ते अंतःकरण शुद्धच होईल!" श्रीमहाराजांनी किती गोड सांगितलं! हा जवळचा मार्ग आहे. पगदंडी आहे, पाऊलवाट आहे. श्रीमहाराजांच्या समोर रडावं पण होतं असं की आपल्याला मी चुकलो, मी पाप केलं ही जाणीवच नाही. तुला आवडत नाही असं वागलोच नाही अशी खात्री पाहिजे आणि नामावर श्रद्धा पाहिजे!

🍁परमपूज्य बाबा बेलसरे (सत्संग)🌿

साधक कसा असावा?

|| श्रीराम समर्थ ||


Monday, May 16, 2016

भक्तीतला निरोध!


श्रीराम. योगातील चित्त वृत्तींचा निरोध बऱ्याच झटापटीनंतर साधतो. भक्तीत मात्र हा निरोध सहज असतो! धरणामध्ये त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी अडवले तर धरणाची भिंत पडण्याचा धोका असतो. पण त्याच पाण्याला दुसरीकडे वाट काढून दिली तर तो धोका टळतो. तसा मनाचा प्रवाह भगवंताकडे वळवला तर कोणताही धोका न होता निरोध साधतो.
म्हणून सातव्या नारद भक्तिसूत्रात म्हटले आहे- सा न कामयमाना निरोधरूपत्वात्।- जेव्हा असा सहज निरोध भक्तिमुळे साधतो, तेव्हा विषयवासनांना आपोआप अटकाव बसतो. पराभक्ति वासनांना पोषक असूच शकत नाही! वासना आहे पण वासना जे तन्निष्ठ! महाराज म्हणायचे, पूर्वेकडे तोंड करून बसलेल्याला पश्चिमेकडे पाठ कर म्हणून सांगावं का लागतं? तसं परमभक्ति ज्याच्या हृदयात उत्पन्न झाली त्याला विषय सोड म्हणून सांगावं लागत नाही!

भक्त कुणाला म्हणावे?



भक्त म्हणजे -


१) भगवंताला वाहिलेली, 

२) भगवंताच्या अनुसंधानात मुरलेली, 
३) भगवंताच्या स्मरणात धुंद झालेली, 
४) भगवंताने व्यापलेली, 
५) वासना मेलेली, 
६) अहंकार व कर्तेपण जळलेली व 
७) भूतमात्रांशी विनम्र झालेली व्यक्ती होय .

~ परमपूज्य बाबा बेलसरे (भगवंताचे अनुसंधान- साधनेचा प्राण)

Wednesday, May 4, 2016

नवीन पुस्तके

श्रीराम. खालील पुस्तकांसाठी श्री अविनाश भाटे यांच्याशी संपर्क साधावा-- फोन नंबर खालील फोटोमध्ये दिलेला आहे. साधकांसाठी अतिशय मार्गदर्शक अशी पुस्तके आहेत.

Monday, February 8, 2016

आज परमपूज्य बाबांची जयंती!

🌺🌺🌺

 !!! नामप्रभात !!!
🌺🌺🌺

श्रीराम. ८ फेब्रूवारी १९०९. या पावन दिवशी जन्म झाला एका अध्यात्मसूर्याचा! परमपूज्य बाबा बेलसरे यांचा. आज त्यांची १०७ वी जयंती. स्वतःचे आयुष्य संपूर्णपणे सद्गुरूंच्या चरणी वाहिल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या नामसाधनेत निरंतर राहून कित्येक लोकांच्या आध्यात्मिक आयुष्याची पहाट करणारे पूज्य बाबा! आज त्यांच्या ‘आनंद-साधनेतील’ नामाबद्दलच्या प्रत्येक साधकाने हृदयाशी घट्ट जपाव्या अशा ओळी-

“भगवंताचे नाम ही ‘दिव्य संजीवनी’ आहे. जो तिचे सेवन करील, त्याच्या जीवनात आतबाहेर स्वस्थता निर्माण करण्याची जबाबदारी भगवंतावर आहे हे साधकाने विसरू नये.”

🌺🌺🌺
!!! श्रीराम समर्थ !!!
🌺🌺🌺