श्रीराम. योगातील चित्त वृत्तींचा निरोध बऱ्याच झटापटीनंतर साधतो. भक्तीत मात्र हा निरोध सहज असतो! धरणामध्ये त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी अडवले तर धरणाची भिंत पडण्याचा धोका असतो. पण त्याच पाण्याला दुसरीकडे वाट काढून दिली तर तो धोका टळतो. तसा मनाचा प्रवाह भगवंताकडे वळवला तर कोणताही धोका न होता निरोध साधतो.
म्हणून सातव्या नारद भक्तिसूत्रात म्हटले आहे- सा न कामयमाना निरोधरूपत्वात्।- जेव्हा असा सहज निरोध भक्तिमुळे साधतो, तेव्हा विषयवासनांना आपोआप अटकाव बसतो. पराभक्ति वासनांना पोषक असूच शकत नाही! वासना आहे पण वासना जे तन्निष्ठ! महाराज म्हणायचे, पूर्वेकडे तोंड करून बसलेल्याला पश्चिमेकडे पाठ कर म्हणून सांगावं का लागतं? तसं परमभक्ति ज्याच्या हृदयात उत्पन्न झाली त्याला विषय सोड म्हणून सांगावं लागत नाही!